सिंदेवाही तालुका औद्योगिक विकासाच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: June 21, 2016 00:42 IST2016-06-21T00:42:12+5:302016-06-21T00:42:12+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगरहित परिसर म्हणून सिंदेवाही तालुक्याची ओळख आहे.

Sindheshahi taluka waiting for industrial development | सिंदेवाही तालुका औद्योगिक विकासाच्या प्रतीक्षेत

सिंदेवाही तालुका औद्योगिक विकासाच्या प्रतीक्षेत

बेरोजगारांच्या हाताला हवे काम : परिसराच्या आर्थिक सुबत्तेसाठी उद्योगाची गरज
बाबुराव परसावार  सिंदेवाही
चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगरहित परिसर म्हणून सिंदेवाही तालुक्याची ओळख आहे. या तालुक्याची लोकसंख्या एक लाख १५ हजार आहे. या तालुक्यात मुख्य व्यवसाय भात शेती असून ७५ टक्के जनता शेतकरी व शेतमजूर आहेत. धानाचे एक पीक घेतल्यानंतर रिकामे राहण्याची पाळी येथील नागरिक व शेतकऱ्यावर येते. सिंचन सोयीचा अभाव व तालुक्यात कोणताही मोठा उद्योग नसल्यामुळे बेरोजगाराच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे युवकामध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. तालुका अनेक सोई-सवलतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्याचा विकासच खुंटल्याचे दिसून येत आहे.
सिंदेवाही तालुक्यात मुख्य पीक भाताचे (धान) असून त्यावर शेतकरी आपली उपजिविका चालवितात. मात्र सिंचनाच्या सोयीअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. तालुक्यातील काही रस्ते अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत आहे. सिंदेवाही-चिमूर हा राज्यमार्ग आहे. परंतु त्याच्या दुरुस्तीचे व रुंदीकरणाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात सुशिक्षीत बेरोजगारांची फौज मोठ्या प्रमाणात वाढत असून कोणत्याही प्रकारचा मोठा उद्योग नसल्याने बेरोजगाराच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बेरोजगाराची समस्या गंभीर बनली आहे. उद्योग नसल्याने युवक अवैध व्यवसायाकडे वळले आहेत. ही चिंताजनक बाब आहे.
बांबू उद्योग
सिंदेवाही तालुक्यात शिवणी वनपरिक्षेत्रात घनदाट जंगल असून या परिसरात बांबू फार मोठ्या प्रमाणावर आहेत. या परिसरात मोहाळी नलेश्वर, जामसाळा, कुकडहेटी, कळमगाव, विरव्हा, वासेरा, शिवणी, कारवा या गावातील हजारो गरीब मजूर बांबूपासून बोरे, ताटवे, टोपल्या, सूप, चटया तयार करून आपली उपजिविका करीत आहेत. परंतु वनविभागाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे हा बांबु उद्योग मोडकळीस आला. पूर्वी या उद्योगाची सिंदेवाही येथे बाजारपेठ होती. बैलगाडीने हा माल सिंदेवाही येथे येत होता. येथून ट्रकद्वारे व रेल्वेद्वारे हा माल नागपूर, अकोला, अमरावती येथे जात होता. या उद्योगामुळे गरीब मजुरांना काम मिळत होते. परंतु वनविभागाच्या चुकीच्या धोरणामुळे या परिसरातील बांबु उद्योग बंद पडलेला आहे. सहकारी तत्वावर हा बांबु उद्योग सुरू केल्यास अनेक ग्रामीण मजुरांना काम मिळू शकते. शिवणी वनपरिक्षेत्रात मुबलक बांबू आहे. हा बांबू इतरत्र पाठविण्यापेक्षा या परिसरातच प्लायवुड किंवा कागद कारखाना (लहान युनीट) सुरू होऊ शकतो. या परिसरातून बोकडी व उमा नदी वाहते. मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
औद्योगिक वसाहत
शासनाने औद्योगिक धोरणानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचे जाहीर केले. त्यानुसार सिंदेवाही ते नवरगाव रोडवर औद्योगिक वसाहतीचा बोर्ड लागलेला आहे. या वसाहतीत पाच एकर जागा उपलब्ध आहे. परंतु या वसाहतीमध्ये एकही उद्योग सुरू करण्यात आले नाही. ज्यांनी उद्योग लावले, तेही बंद अवस्थेत आहे. सध्या या वसाहतीमध्ये इंडीयन गॅसचे गोडावून आहे. इतर कोणतेही नवीन लघुउद्योग सुरू झाले नाही. सिंदेवाही तालुक्यात राईस मील व पोहा मील आहेत. पण त्यात पाहिजे तेवढा रोजगार उपलब्ध होत नाही. या परिसरात वनावर आधारित उद्योग, कागद कारखाना, तेल गिरणी, औषधी निर्मिती, पर्यटनावर आधारित उद्योग, लोह खनिजावर आधारित उद्योग सुरू होऊ शकतात. सिंदेवाही येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येथे भात संशोधन केंद्र, कृषी संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र सुरू आहे. सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ निर्माण झाल्यास या परिसरातील शेतमजूर, बेरोजगार युवक व महिलांना रोजगार उपलब्ध होऊ शकते. त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी अजूनपर्यंत तालुक्यातील शेतजमिनीला मिळाले नाही.

उद्योगाअभावी बाजारपेठेवर परिणाम
या तालुक्यात उद्योग नसल्याने या परिसरातील नागरिकांचे जगणे शेतीवर निर्भर आहे. शेतीच्या उत्पादनावरच या भागातील बाजारपेठाचे आर्थिक व्यवहार चालते. यंदा दुष्काळ स्थिती निर्माण झाल्याने बाजारपेठ व व्यापारावर परिणाम झाला. त्यामुळे या परिसरात उद्योगाची निर्मिती होणे आवश्यक आहे.
- रमेश बिसेन, अध्यक्ष, व्यापारी संघटना, सिंदेवाही
कृषी विद्यापीठाची आवश्यकता
तालुक्यात उद्योग निर्माण झाल्याशिवाय व्यापार व बाजारपेठ वृद्धींगत होणे अशक्य आहे. बाजारपेठेला संजीवनी देण्यासाठी या परिसरात उद्योग येणे गरजेचे आहे. येथील औद्योगिक विकास व कृषी विद्यापीठ निर्माण झाल्यास बाजारपेठेला बळकटी येईल व युवकांना रोजगार मिळेल.
- राजकुमार धामेजा, प्रतिष्ठित व्यापारी, सिंदेवाही

Web Title: Sindheshahi taluka waiting for industrial development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.