शिवसेना राबविणार सामाजिक उपक्रम
By Admin | Updated: June 24, 2015 01:34 IST2015-06-24T01:34:03+5:302015-06-24T01:34:03+5:30
यंदाचे वर्ष शिवसेना सूवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून राबवित असून चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षानिमीत्त अनेक सामाजिक उपक्रमांचा संकल्प शिवसेनेने केला आहे.

शिवसेना राबविणार सामाजिक उपक्रम
तीन महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम : जिल्हाभर शिबिरांचे आयोजन
चंद्रपूर : यंदाचे वर्ष शिवसेना सूवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून राबवित असून चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षानिमीत्त अनेक सामाजिक उपक्रमांचा संकल्प शिवसेनेने केला आहे. या अंतर्गत समाजातील सर्व घटकांपर्यंत सेवा पोहचविण्यात येणार असल्याची माहिती भद्रावतीचे नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल धानोरकर यांनी दिली.
या संदर्भात माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेला चंद्रपूरचे माजी उपमहापौर संदीप आवारी, भारतीय विद्यार्थी सेनेचे मनोज पाल, महिला शिवसेनेच्या पदाधिकारी कुसूम उदार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल धानोरकर म्हणाले, १९ जूनला शासकीय रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा सरकारी रूग्णालयात जन्मलेल्या बालकांच्या नावे १८ वर्षापर्यंतचे फिक्स डिपॉजिट असलेले पाच हजार रूपयांचे बचतपत्र काढून पालकांना दिले जाईल. त्यासाठी रूग्णालयांकडून बाळांची नावे घेणे सुरु आहे. या सोबतच, १९ जूनला ५० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांचा सत्कारही शिवसेनेच्या वतीने केला जाणार आहे.
सामाजिक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या ५० महिलांचा सत्कार तसेच ५० वर्षे पूर्ण केलेल्या सामाजिक संस्थांचा शिवसेना प्रमुखांच्या नावाने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला जाणर आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली निबंध स्पर्धा ठेवली जाणार असून त्यात स्थानिक विषय दिले जाणार आहेत. सर्व तालुकास्तरावर आणि मोठ्या गावांमध्ये शिवसेनेच्या वतीने नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवले जाणार आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने नागरिकांमध्ये जागृतता यावी यासाठी सर्व रूग्णालयांमध्ये वृक्षारोपण केले जाणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत कचरा साठविण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालये, बसस्थानक, पंचायत समिती, वाचनालये अशा सार्वजनिक ठिकाणी डस्टबिन उपलब्ध करून दिले जाईल. वयोवृद्ध नागरिकांना लाकडी काठींचे वितरणही या उपक्रमांतर्गत केले जाणार आहे. वरोरा विधानसभा क्षेत्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील एक हजार शालेय विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना संपूर्ण अभ्यासक्रमासह टॅबचे वितरण करण्याच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचीही घोषणा यावेळी अनिल धानोरकर यांनी केली. या सोबतच, वरोरा विधानसभा क्षेत्रातील फ्लोराईडयुक्त गावांमध्ये संयंत्र उभारून पाणी फ्लोराईडमुक्त करण्याचाही संकल्प करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला सुरेश पचारे, नगरसेवक काका सातारकर, नितीन कोवासे, महेश मडावी, नितीन कोवे, विनोद वानखेडे, प्रोद पाटील, रोहन धोंगडे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)