वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील शिवनी ते पेडगाव या रस्त्याचे काम मागील तीन वर्षापासून सुरू आहे. परंतु मागील तीन महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद अवस्थेत आहे.
वासेरापासून एक किलोमीटर अंतरावर काम अपूर्ण असून फक्त गिट्टी टाकलेली आहे. तसेच बामणी चक ते बामणी माळपर्यंत फक्त गिट्टी टाकलेली आहे. नागरिकांना तसेच दुचाकी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कधी कधी तर वाहनचालकांचा अपघात होत असतो. कुणाची गाडी पंक्चर होत असते. तसेच बामणी ते पेडगाव हा तीन किलोमीटरचा रस्ता अजूनही तसाच आहे. त्या रस्त्याने नुसती धूळ गावात जात असते, अशी ओरड आहे.
शिवनी-पेठगाव मार्गे जात असताना अनेकांची वाहने पंक्चर होत असून टायरही फुटून अपघात होत आहेत. कासवगतीने होत असलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
पुलाचे बांधकामही अपूर्ण अवस्थेत आहे. पावसाळा सुरू होण्याला दोन महिने शिल्लक असताना पुलाचे काम कधी होणार, हा नागरिकांचा प्रश्न आहे. सदर काम जलदगतीने करावे. नागरिकाचा असंतोष दूर करावा तसेच शेतकऱ्यांची समस्या जाणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.