शारदा पॉवर प्लाँटने केले चिमूर भारनियमनमुक्त
By Admin | Updated: April 18, 2015 01:18 IST2015-04-18T01:18:48+5:302015-04-18T01:18:48+5:30
वाढत्या लोकसंख्येमुळे चिमूर शहरासह गावखेड्यातही विजेची मागणी वाढली आहे.

शारदा पॉवर प्लाँटने केले चिमूर भारनियमनमुक्त
चिमूर : वाढत्या लोकसंख्येमुळे चिमूर शहरासह गावखेड्यातही विजेची मागणी वाढली आहे. मागणीच्या प्रमाणात मात्र विजेचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला भारनियमन काही तासाचे करावे लागत आहे. भारनियमनातून जनतेची मुक्तता करण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहे. मात्र चिमूरमध्ये मागील तीन वर्षांपासून १० मेगावॅटची वीज निर्मिती करणाऱ्या शारदा पॉवर प्लाँटने मात्र चिमूर शहराला भारनियमातून सुटका केली आहे.
खनिज संपत्तीने नटलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोळशावर आधारीत अनेक उद्योग आहेत तर जिल्ह्याला वीज उत्पादन करणारा जिल्हा म्हणूनही ओळखल्या जाते. मात्र वीज उत्पादन करूनही जिल्ह्यात आठ-आठ तासाचे भारनियमन केले जाते. या भारनियमनातून बाहेर निघण्यासाठी वीज कंपनीने सिंगल फेज योजना राबवून ग्रामीण जनतेला काही प्रमाणात दिलासा दिला होता. तरीही वीज कंपनी सातत्याने विजेच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
उद्योगविरहीत असलेल्या चिमूर तालुक्यात एकमात्र उद्योग शारदा पॉवर प्लाँटच्या माध्यमातून ३० जून २००८ मध्ये १६ एकर परिसरात प्लाँट सुरू करण्यात आला. या प्लाँटमध्ये १० मेगावॅट वीज तयार करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांचे निरूपयोगी वस्तू यसे धानाचा कोंडा, कुटार, पऱ्हाटीचे फने इत्यादी वापरून वीज तयार केली जात आहे.
यासाठी प्लाँटमध्ये रोज ४० ट्रक वेस्ट मटेरियल वापरल्या जातो. या मटेरियलमुळे २८० शेतकऱ्यांचा परिवारांना दिलासा मिळाला आहे तर शेतकऱ्यांच्या या वेस्टेज मटेरियलला पॉवर प्लांटमुळे मागणी वाढून आर्थिक लाभ झाला आहे.
हे सर्व सुरळीत सुरू असताना मे २०१३ मध्ये हा प्लाँट काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडला. या दरम्यान प्लाँटचे आठ कोटीचे नुकसान झाले. त्यानंतर फेब्रुवारीपासून हा प्लांट आणखी चिमूरवासीयांच्या सेवेत दाखल झाला आहे. (शहर प्रतिनिधी)