सात संशयित पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: November 18, 2015 01:04 IST2015-11-18T01:04:31+5:302015-11-18T01:04:31+5:30
शहरातील ऊर्जानगर भागातील राष्ट्रवादीनगरमध्ये रविवारी रात्री दोन घरी दरोडा घालून चोरट्यांनी अंदाजे पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.

सात संशयित पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादीनगरातील दरोडा : पालकमंत्र्यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
चंद्रपूर : शहरातील ऊर्जानगर भागातील राष्ट्रवादीनगरमध्ये रविवारी रात्री दोन घरी दरोडा घालून चोरट्यांनी अंदाजे पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. सामान्य नागरिकांना हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध जारी केला असून घटनेनंतर दुर्गापूर पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून विचारपूस केली जात आहे. असे असले तरी या दरोडा प्रकरणाचा अद्याप ठोस धागादोरा पोलिसांना गवसला नाही.
रविवारी रात्री राष्ट्रवादीनगरमधील महेश भानारकर, करण कुंभारे यांच्या घरात दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर अक्षरश: धुमाकूळ घातला. घरातील सर्वांना एका खोलित बंद करून दरोडेखोरांनी घरात हात साफ केला. या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच आता दरोड्यासारख्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून तपासणी केली. (प्रतिनिधी)
फोन न लागल्याने गफलत
कुंभारे व भानारकर यांच्या घरात दरोडेखोर शिरून असताना नागरिकांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात दूरध्वनी लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तो फोन लागत नसल्याने अखेर त्रस्त होऊन रामनगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. रामनगर पोलिसांनी लगेच वायरलेसवरून दुर्गापूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने दुर्गापूर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. मात्र तोवर दरोडेखोर पसार झाले होते, असे नागरिकांनी सांगितले. सूचना मिळताच, रामनगर पोलीस जर घटनास्थळी पोहचले असते, तर कदाचित दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले असते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मुनगंटीवारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्याचे वन व वित्त नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेची तातडीने दखल घेत गृह खाते असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली. या घटनेवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.