जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्प कोरडे
By Admin | Updated: May 31, 2015 01:52 IST2015-05-31T01:52:54+5:302015-05-31T01:52:54+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुर्य आग ओकू लागला आहे. या आठवड्यात तापमान ४६ ते ४८ यादरम्यानच कायम राहिले आहे.

जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्प कोरडे
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुर्य आग ओकू लागला आहे. या आठवड्यात तापमान ४६ ते ४८ यादरम्यानच कायम राहिले आहे. वाढत्या उष्णतामामुळे जिल्ह्यातील जलस्रोत आटत चालले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच प्रकल्प ड्राय होण्याच्या मार्गावर आहेत. भूजल पातळीही कमालीची खालावली आहे. जिल्ह्यातील अकरा सिंचन प्रकल्पापैकी सात प्रकल्पात आजच्या तारखेत ठणठणाट आहे. उर्वरित जलाशयातही अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मार्चच्या पंधरवाड्यानंतरच उन्हाळ्याची चाहुल लागते. पुढे एप्रिल, मे आणि जून महिन्यात ही धग कायम राहते. यावर्षी एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस पडला. मात्र त्याआधीच जिल्ह्यातील प्रकल्पाची स्थिती चिंताजनक होती. अवकाळी पावसाचा भूजल पातळीत फारसा परिणाम झाला नाही. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत तापमान फारसे तीव्र नव्हते. मात्र त्यानंतर तापमानात अचानक वाढ होऊ लागली. १५ ते ३० मेदरम्यान तर उष्णतेने सीमाच गाठली. सुर्याचा पारा ४७ अंशापार गेला. तिव्र उष्णतामानामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक होरपळून निघत आहेत. अनेक जणांना उष्माघातामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. या तापमानामुळे जिल्ह्यातील जलस्रोत आटून पाण्याची पातळीही कमालीची खालावली आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांवरही पडला आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ड्राय होण्याच्या मार्गावर आहे. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, लभानसराड, दिना हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चारगाव सिंचन प्रकल्पात केवळ ६.७४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. म्हणजे पुढील आठवड्यात हा प्रकल्पही कोरडा होईल. उर्वरित प्रकल्पातही फारसा जलसाठा नाही. अमलनाला प्रकल्पात १७.५० टक्के, पकडीगुड्डम प्रकल्पात २०.२८ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात १७.१६ टक्के तर इरई धरणात ४५.५५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. सिंचन प्रकल्पातच पाणीसाठा नाही तर इतर पाण्याच्या स्रोताचे काय हाल असतील, हे कुणालाही कळेल. गावखेड्यातील पाण्याचे स्रोत म्हणजे बोअरवेल आणि विहीर असतात. मात्र बोअरवेल आणि विहिरीही आता आटत आल्या आहेत. अनेक विहिरींना पाणी नाही. बहुतांश गावातील हातपंप नादुरुस्त आहेत. जिथे हातपंप सुरू आहे, तिथे हातपंपात पाणी नाही. त्यामुळे सद्यस्थितीत शेकडो गावांमध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दूरवरून नागरिकांना पाणी आणावे लागत आहे. असे असतानाही प्रशासाने अद्याप कोणत्याही गावात टँकर लावलेला नाही.
दरवर्षी जिल्ह्यात पाण्याची भिषण टंचाई निर्माण होत असताना प्रस्तावित आणि मंजूर उपाययोजना का पूर्णत्वास नेल्या जात नाही, याबाबत संभ्रम निर्माण होतो. या सर्व गोष्टीला अधिकाऱ्यांमधील उदासीनताच कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
उपाययोजना बोटावर मोजण्याइतक्या
जिल्हा परिषदेने उन्हाळ्याची चाहुल लागण्यापूर्वीच मोठ्या उत्साहाने पाणी टंचाई आराखडा तयार केला. त्यासाठी प्रशासकीय मान्यताही घेतली. मात्र हा आराखडा उपाययोजनाच्या स्वरुपात रुपांतरित होऊ शकला नाही. या कृती आराखड्यांतर्गत नवीन विंधन विहीर व कुपनलिका, नळ योजनेची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना, टँकर-बैलगाडीने पाणी पुरवठा करणे, विहिरीचे खोलीकरण, गाळ काढणे, इनवेल बोर, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, विंधन विहिरींचे जलभंजन आदी उपाययोजना गावागावात करायच्या असतात. मात्र या उपाययोजना पाणी पुरवठा विभाग बोटावर मोजण्याइतक्या गावातच करू शकला आहे.
पाऊस वेळवर आला नाही तर..
तीन दिवसांपूर्वी मान्सून वेळेच्या चार दिवस आधी देशात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. आता मात्र मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खाते वर्तवित आहे. अंदाज काहीही असो, मात्र जिल्ह्यात पाऊस वेळेवर आला नाही तर पाण्याची भिषण टंचाई जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फटका शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांसोबत उद्योजकांनाही बसणार आहे.
मामा तलावांमध्येही पाण्याची टंचाई
जिल्ह्यात शेकडो मामा तलाव अस्तित्वात आहे. ग्रामीण भागातील महत्त्वाचे जलस्रोत म्हणून मालगुजारी तलावांकडे बघितले जाते. मात्र सद्यस्थितीत मामा तलावांचीही स्थिती वाईट आहे. अनेक मामा तलाव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. सिंचन विभागाकडे निधीच नसल्याने या तलावांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता तलावातील फारच कमी जलसाठा असून काही तलाव ड्राय झाले आहे.