तेलंगण सीमेलगत कापसाची कवडीमोल भावात विक्री
By Admin | Updated: January 2, 2017 00:57 IST2017-01-02T00:57:48+5:302017-01-02T00:57:48+5:30
सध्या तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्यातील काही गावामध्ये कापूस खरेदी दलालामार्फत

तेलंगण सीमेलगत कापसाची कवडीमोल भावात विक्री
नोटाबंदीचा शेतकऱ्यांना फटका : परजिल्ह्यातील दलालांचा गावागावांत शिरकाव
नांदाफाटा : सध्या तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्यातील काही गावामध्ये कापूस खरेदी दलालामार्फत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात नोटाबंदीमुळे कापसाची ४००० ते ४२०० रुपयात दलालांकडून खरेदी सुरू असल्याने शेतकऱ्यांची लूट होत आहे. बँकामार्फत अधिक रक्कम मिळत नसल्याने याचा फायदा घेत गावांमध्ये शेतकऱ्यांशी दलालांमार्फत नगदी व्यवहार केला जात आहे. यात ५२०० ते ५३०० रुपयांपर्यंत विकला जाणारा कापूस ४ हजार ते ४२०० रुपयात गरजेपोटी शेतकरी देत आहे.
वर्धा, हिंगणघाट,यवतमाळ या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसह तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील व्यापाऱ्यांचे दलालही या खरेदीत गुंतले आहे. गावात पहाटे येऊन शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळणार नाही. चेकद्वारे पैसे दिल्यास अधिक वेळ लागेल, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांच्या घरी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधींना पाठवून शेतकऱ्यांचे मन वळवून कापूस विक्री करण्यास भाग पाडत असल्याचेही समजते. यात परिसरातील काही जण आपली पोळी शेकताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरपना, जिवती, राजुरा या तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. ऐन पिके हाती आल्यानंतर नोटाबंदी झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर विरजण पडले आहे. जिल्हा सहकारी बँकामार्फत शेतकऱ्यांना अधिक पैसे काढता येत नाही तर दुसरीकडे बहुतांश शेतकऱ्यांचे खाते हे जिल्हा सहकारी बँकेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कौटुंबिक गरज भागविताना वणवण करावी लागत आहे.
अनेकांकडे मुलींचे लग्न जुळले असून शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. अशातच बँकांकडून पैसे मिळत नसल्याने नाईलाजास्तव दलालांमार्फत कापसाची विक्री करावी लागत आहे. यात शेतकऱ्यांची क्विंटल मागे १ हजार ते १५०० रुपयांची लूट होत असून मोठा फटका बसत आहे.
इतर कापूस खरेदी केंद्रावर काही व्यापारी चेकद्वारे पैसे देत आहे. मात्र बँकामार्फत पैसे निघत नसल्यानेही शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे. तेव्हा अशा दलालांवर कारवाई करण्याची गरज नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
कापूस संकलन केंद्राचा अभाव
४कापूस संकलन केंद्र यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे काही शेतकरी मुकटबन, वणी, हिंगणघाट येथे कापसाची विक्री करतात. तर वाहतुकीचा खर्च अधिक येत असल्याने अनेक शेतकरी गावातच व्यापाऱ्यांना कापूस देणे पसंत करतात. मात्र भल्या पहाटे येऊन आज भाव एवढाच असल्याचे सांगून दलाल कापसांची खरेदी तेलंगणा सीमेलगतच्या गावातून करीत आहे.
नगदी पैसा येतोय कुठून ?
बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा दिली असताना कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पैसे असल्याचे दिसून येत आहे. हा पैसा येतोय कुठून, असा सवालही आता नागरिक करीत आहे. विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांकडे नवीन नोटांचा भरणा अधिक आहे. नागरिक चलनटंचाईमुळे गेल्या ५० दिवसांपासून भरडले जात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना कोणती बँक पैसे विड्राल करून देते, याचाही शोध घेणे यानिमित्ताने गरजेचे झाले आहे.