शिष्यवृत्तीची माहिती मिळणार एसएमएसद्वारे
By Admin | Updated: March 25, 2015 01:25 IST2015-03-25T01:25:57+5:302015-03-25T01:25:57+5:30
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांसह इतर जातीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळते.

शिष्यवृत्तीची माहिती मिळणार एसएमएसद्वारे
खडसंगी : महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांसह इतर जातीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्तीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी समाजकल्याण विभागाने एसएमएस सुविधा सुरू केली आहे. यासाठी समाज कल्याण विभागाने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीकडून संगणक प्रणाली तयार केली आहे. मागील दोन-तीन महिन्यापूर्वी ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून राज्यभरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे.
कनिष्ठ महाविद्यालय ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विविध जाती, जमातीमधील विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये महाविद्यालयाची शैक्षणिक फी व स्टायफंडचा समावेश आहे. शैक्षणिक फी महाविद्यालयाच्या बँकेत असलेल्या खात्यावर जमा करण्यात येते तर स्टायफंड हा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जातो. मध्यंतरी राज्यातील काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीमध्ये गोंधळ केल्यामुळे समाजकल्याण विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर शासनाने शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन प्रक्रिया विकसीत केली.
या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्राच्या माहितीसह शिक्षण घेतलेले वर्ष, महाविद्यालयाची माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले. त्याचबरोबर मोबाईल क्रमांक तसेच अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचे ज्या बँकेत खाते आहे त्याचा खाते क्रमांक असणे गरजेचे आहे. त्यानंतर प्राचार्याने शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणारी फी जमा करून घेण्यासाठी ज्या बँकेत खाते आहे त्याचा क्रमांक अर्जावर टाकणे बंधनकारक केले आहे. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची माहिती समाजकल्याण विभागाकडे एकत्रीत जमा झाल्यामुळे शिष्यवृत्ती जमा करण्याचे काम सोपे झाले.
मागील काही महिन्यांपासून संगणक प्रणाली विकसित करून त्यांची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्याने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती टाकण्यात आली. मागील दोन महिन्यापासून एसएमएस सुविधा सुरू झाली असून या सुविधेचा लाभ लाखो विद्यार्थ्यांना होत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली आहे. (वार्ताहर)