ग्रामीण रोजगाराला पिंपळगावात खिंडार
By Admin | Updated: August 27, 2015 01:24 IST2015-08-27T01:24:28+5:302015-08-27T01:24:28+5:30
तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथील मनरेगाच्या कामगारांना मजुरी मिळाली नाही.

ग्रामीण रोजगाराला पिंपळगावात खिंडार
प्रकरणाची चौकशी करा : ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन
ब्रह्मपुरी : तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथील मनरेगाच्या कामगारांना मजुरी मिळाली नाही. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून मजुरांना न्याय मिळवून देण्याची मागणी शिवसेनेचे प्रा. अमृत नखाते यांनी राज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिलेल्या निवेदनातून केली.
जगातील सर्वात मोठी रोजगार योजना म्हणून ‘मनरेगा’चा उल्लेख केला जातो. मात्र, स्थानिक पातळीवर यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्याने योजनेच्या मूळ संकल्पनेला खिंडार पडलेली दिसत आहे. ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून पिंपळगाव येथे काम करण्यात आले. यादरम्यान अनेक मजुरांची नोंदच करण्यात आली नाही. यामध्ये बोगस मजुरांचे नावदेखील टाकण्यात आले.
सर्व मजुरांची रक्कम रोजगार सेवकाने आपल्याच बँक खात्यात जमा केली. मात्र, कामगारांनी मजुरी मिळाली नाही. २०१४ यावर्षी याच योजनेच्या माध्यमातून क्रीडा मैदानाचे काम करण्यात आले. यामध्येदेखील कामगारांना मोबदला दिला गेला नाही. चौकशीअंती हे स्पष्ट झाल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस कार्यवाही केली नाही.
मजुरांनाही मोबदला मिळाला नाही. याचदरम्यान ग्रामीण विकास राज्यमंत्री दीपक केसरकर हे जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यासाठी शहरात आले असता शिवसेनेचे ताालुका प्रमुख प्रा. अमृत नखाते यांच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्र्यांची भेट घेतली. या प्रकरणात विशेष लक्ष घालून सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. पीडित मजुरांना त्यांचा हक्क न दिल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील निवेदनात देण्यात आला. शिष्टमंडळात तालुका प्रमुखासह, शहर प्रमुख श्यामराव भानारकर, गुड्डू वाहारे, निर्मला राऊत, जया कन्नाके व अन्यायग्रस्त मजूर यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)