रस्त्यांची लागली वाट

By Admin | Updated: August 15, 2015 01:24 IST2015-08-15T01:24:42+5:302015-08-15T01:24:42+5:30

मागील सहा महिन्यांपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात आले. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चंद्रपुरातील रस्त्यांची पोल खोलली आहे.

The roads started to fall | रस्त्यांची लागली वाट

रस्त्यांची लागली वाट

मनपाची पोलखोल : पावसात रस्त्यांची दाणादाण
चंद्रपूर : मागील सहा महिन्यांपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात आले. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चंद्रपुरातील रस्त्यांची पोल खोलली आहे. सहा महिन्यापूर्वी दुरुस्ती झालेल्या शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी जीवणेघे खड्डे पडले आहेत. स्वच्छ, पारदर्शी व दर्जेदार कामाचा पदाधिकारी व अधिकारी दावा करीत असले तरी ते फोल ठरले असून शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.
डांबरीकरण उखडण्याला जबाबदार कोण
महिनाभरापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या काही रस्त्यांवर खड्डे आहेत. मात्र पावसामुळे डांबरीकरण पूर्ण उखडले आहे. त्यामुळे रस्त्यावर दगडकणांचा थर साचला आहे. यावरुन दुचाकी वाहने घसरत आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून खड्डे बुजविले जातात. मात्र पुढच्या वर्षी पून्हा त्याच ठिकाणी खड्डे पडतात. यावरुन खड्डे भरण्याच्या कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंतर्गत रस्त्यांची स्थिती दयनीय
शहरातील मुख्य रस्त्यांपेक्षा वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. पावसाने उघाड दिल्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात येईल. मात्र पावसामुळे पुन्हा खड्डे पडतील. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही लोकांना खड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.
शहरातील नागरिकांना अपेक्षा
केंद्रात, राज्यात व मनपात भाजपाची सत्ता आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर अशा दोन वजनदार नेत्यांचे हे शहर आहे. पालकमंत्री भाजपाचेच आहेत. त्यामुळे रस्ते तातडीने चकाचक होती, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील रस्त्यांची १४ कोटींचा निधी नुकताच मंजूर केला असून या निधीतून लवकर रस्ते दुरूस्ती व्हावी अशी अपेक्षा आहे.
पावसाळ्यात रस्त्यांची कामे बंद असल्याने नागरिकांना पुढील काही महिने जीवघेणे खड्डे रोजच सहन करावे लागणार आहे. यामुळे पाठीचे, मनक्यांचे आजार वाढत चालले आहेत. नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यावरुन दुचाकीने दिवसातून एकदा तरी चक्कर मारावी आणि होणारा त्रास लक्षात घ्यावा, अशा शब्दात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे कोट्यवधी रूपये रस्ता बांधकामावर खर्च करण्यात येत आहे. मात्र पहिला पाऊस आला आणि रस्त्यांची अवस्था जैसे थे झाली. सहा महिन्यापूर्वी डांबरीकरण केलेल्या बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नागरिकांची ओरड सुरू आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडे याचे उत्तर नाही. पावसाने काही दिवस उघाड दिल्यानंतर दोन-चार खड्डे बुजवून खड्डे बुजविण्याची मोहिम सुरू असल्याचा देखावा निर्माण करण्यात आला. मात्र डागडुजी केलेल्या रस्त्यांचीही वाट लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्यांची दुरूस्ती केली किंवा नाही, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
लोकमत चमूने गुरुवारी शहरातील रस्त्यांची पाहणी केली, तेव्हा काही अपवाद वगळता बहुसंख्य रस्त्यांवर खड्डे पडलेले दिसले. केलेले डांबरीकरण एका पावसाने उखडतेच कसे ? या कामांमध्ये भ्रष्टाचार तर झाला नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक मार्गावरील गिट्टी बाहेर आली आहे.
जटपुरा गेट ते गिरणार रस्त्यावरील जटपुरा गेट ओलांडताच मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे येथे दुचाकी गेल्यास मोठा अपघात घडू शकते. तर जटपुरा गेट ते रामनगर मार्ग हा पुर्णत: उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
हनुमान खिडकी-भिवापूर मार्ग, छोटा बाजार चौक, बांगला चौक- बाबुपेठ मार्ग, भावसार चौक, कस्तुरबा मार्ग, गांधी चौक-पठाणपुरा, आंबेडकर मार्ग, मूल मार्ग, बिनबा मार्ग, दादमहल वॉर्डातील रस्ते पूर्णत: उखडले आहेत. तर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासना याकडे लक्ष देईल का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The roads started to fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.