महसूल विभागाच्या आडकाठीत पहाडावर हरितक्रांतीचे स्वप्न भंगले !
By Admin | Updated: May 16, 2016 00:57 IST2016-05-16T00:57:04+5:302016-05-16T00:57:04+5:30
पहाडावर हलाखीचे जीवन जगणाऱ्या आणि कोरडवाहू शेती करून निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी.

महसूल विभागाच्या आडकाठीत पहाडावर हरितक्रांतीचे स्वप्न भंगले !
२ कोटी १३ लाखांचा दंड : ठेकेदाराने केले काम बंद
शंकर चव्हाण - जिवती
पहाडावर हलाखीचे जीवन जगणाऱ्या आणि कोरडवाहू शेती करून निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी. त्यातून शेतीच्या उत्पन्नात भर पडेल व आर्थिक स्थिती सुधारेल, या हेतूने जिवती येथे लघुसिंचन विभागाकडून तलावाचे काम मंजूर झाले. काम जोमात असतानाच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंचन तलावाच्या कामावर भेट देवून संबंधित कंत्राटदारावर २ कोटी १३ लाखाचा दंड ठोठावल्याने तलावाचे काम बंद करून कंत्राटदार निघून गेला. परिणामी पहाडावर हरितक्रांती निर्माण होण्याचे स्वप्न भंगले आहे.
वर्षानुवर्षे पावसाचा अनियमितपणा व निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात बरीच घट झाली आहे.
पहाडावर ९० टक्के शेतकरी असून कोरडवाहू शेतीच्या उत्पन्नावरच आपल्या संसाराचा गाडा चालवितात. जवळपास सिंचनाची सोय नसल्याने लवकरच शेतीची कामे आटोपली जातात. त्यानंतर रोजीरोटी कमविण्यासाठी इतरत्र वणवण भटकण्याची वेळ वर्षानुवर्षे बघायला मिळते.
जिवतीत लघुसिंचाई विभागाकडून सिंचन तलावाचे काम मंजूर झाल्याने जिवती, देवलागुडा, लोलडोहसह परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सिंचन व्यवस्थेवर आधारित शेती करण्याचे स्वप्न बघत होते पण दुष्काळात तेरावा महिना, या उक्तीप्रमाणे त्यात महसूल विभागाची आडकाठी आली अन् काम बंद पडले. हरित क्रांतीचे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंगणार की काय असा प्रश्नही आता शेतकऱ्यांना पडला आहे.
महसूल विभागाने कारवाई केली. सिंचन तलावाचे काम बंद पडले. आता पुढे काय, कोरडवाहू शेती करून जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांचे काय होईल, यावर महसूल विभागानेच चिंतन करण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.