अनेक ग्रामपंचायतींचा निकाल धक्कादायक

By Admin | Updated: August 7, 2015 00:04 IST2015-08-07T00:04:31+5:302015-08-07T00:04:31+5:30

भद्रावती तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतीत भाजपाचे वर्चस्व दिसून आले. त्यापाठोपाठ काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार जवळपास बरोबरीने निवडून आले.

The results of many Gram Panchayats are shocking | अनेक ग्रामपंचायतींचा निकाल धक्कादायक

अनेक ग्रामपंचायतींचा निकाल धक्कादायक

चंद्रपूर : जिल्ह्यातील ६१० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. गुरूवारी मतमोजणी झाली. आता सर्व ग्रामपंचायतींमधील सत्तेचे चित्र स्पष्ट झाले असून या निकालात अनेक ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल लागल्याचे पहायला मिळाले.
भद्रावती तालुक्यात त्रिशंकू स्थिती
भद्रावती : भद्रावती तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतीत भाजपाचे वर्चस्व दिसून आले. त्यापाठोपाठ काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार जवळपास बरोबरीने निवडून आले. ५५ ग्रामपंचायतसाठी ही निवडणूक झाली. यात एकूण ९३८ उमेदवार रिंगणात होते. सर्वात मोठी ग्रामपंचायत माजरी येथील १७ सदस्यांपैकी आठ सदस्य भाजपाचे, घोडपेठ मध्ये ११ सदस्यांपैकी सहा सदस्य भाजपाचे, नंदोरी येथे नऊ पैकी ४ सदस्य शिवसेना तर ४ सदस्य भाजपाचे तसेच चंदनखेडा येथे ११ पैकी ४ सदस्य काँग्रेसचे, भटाळी येथे ७ पैकी ७ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे तर कोकेवाडा (तु.) येथे ९ पैकी ९ सदस्य शिवसेनेचे निवडून आले. चालबर्डी (रै.) येथे दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. दोघांनाही ८८ मते मिळाली होती. यात ईश्वर चिठ्ठीने शेषराव नागपूरे यांचा विजय झाला. नंदोरी येथे भाजपाला ४ व सेनेचे ४ उमेदवार निवडून आले. काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली. पिपरी (दे) येथे शिवसेना ३ व काँग्रेस ४ अशी स्थिती आहे. कोकेवाडा (मा.) येथे सात पैकी सातही सदस्य काँग्रेस व राष्ट्रवादी युतीचे निवडून आले. चंदनखेडा येथे भाजपचा फक्त एक उमेदवार निवडून आला. विसापूर (रै) मध्ये ५ उमेदवार शिवसेनेचे निवडून आले. चोरा, चंदनखेडा मध्ये काँग्रेसने आघाडी घेतली असून भाजपा माघारली आहे. कोकेवाडा (तु.) येथे शिवसेनेचे ९ पैकी ९ ही उमेदवार निवडून आले.
मूल तालुक्यात भाजपाचे वर्चस्व
मूल : तालुक्यात झालेल्या ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने २३ ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध केले असून काँग्रेसला ८ जागांवरच समाधान मानावे लागले. बहुजन समाज पार्टीने प्रथमच केळझर व जानाळा या दोन ग्रामपंचायतीवर सत्ता बसविली असून जिल्हा परिषदच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले व जि.प. सदस्य विनोद अहीरकर यांना फिस्कुटी व नांदगाव येथील उमेदवाराचा फज्जा उडाला. फिस्कुटी एक तर नांदगावात तिनवरच समाधान मानावे लागले. तालुक्यात भाजपाने सत्ता काबीज केलेल्या २३ ग्रामपंचायतीमध्ये भादुर्णी, चिमढा, मरेगाव, डोंगरगाव, गांगलवाडी, राजोली, नांदगाव, गोवर्धन, गवराळा, चांदापूर, चिंचाळा, बोरचांदली, पिपरी दीक्षित, येरगाव, खालवसपेठ, सुशी, दाबगाव, चिरोली, चिमढा, कोसंबी, उथळपेठ, चिखली, जुनासूर्ला या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर काँग्रेसने मारोडा, करवन, काटवन, मूरमाडी, फिस्कुटी, बोडाळा बुज, नवेगाव भूजला, हळदी, नलेश्वर या ८ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. अपक्ष समर्थित ३ ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता बसणार हे सध्या तरी सांगता येणार नाही. या निवडणुकीत सत्तारुढ पक्षांना जनतेनी नाकारले असून त्यात सत्ता परिवर्तन झाल्याने दिसून येते. विशेषत: राजकीय दृष्ट्या संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या मारोडा, राजोली, डोंगरगाव, नांदगाव, चिंचाळा, बोरचांदली, सुशी, दाबगाव, केळझर, जानाळा, चिरोली, चिमढा आदी गावांचा समावेश आहे.
चिमूर तालुक्यात काँग्रेसला आघाडी
चिमूर : तालुक्यातील ८१ ग्रामपंचायत मधील मोठ्या ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस पक्षाने बाजी मारली तर सत्ताधारी पक्षाच्या गटाला जोरदार हादरा बसला आहे. तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत भिसी, नेरी, शंकरपूरमध्ये १७ ग्रामपंचायत सदस्य असून भिसीमध्ये काँग्रेस प्रणित अरविंद रेवतकर गटाचे ८ उमेदवार विजयी झाले. तर घनश्याम डुकरे व धनराज मुंगले गटाचे ६ उमेदवार आल्याने भाजपाचा दणदणीत पराभव झाला. तर शंकरपूरमध्ये डॉ. अविनाश वारजूरकर यांचे वर्चस्व असून त्यांचे १२ उमेदवार विजयी झाले. नेरीमध्ये संजय डोंगरे व प्रा. राम राऊत यांच्या गटाचे काँग्रेसचे ८ उमेदवार विजयी झाले. मासळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे ९ उमेदवार विजयी झाल्याने पहिल्यांदाच सत्तेत आले. वहानगावमध्ये मनसेने सातही जागा जिंकल्या. टेकेपारमध्ये गणोरकर गटाचा सफाया होवून काँग्रेसचे ६ उमेदवार निवडून आले. लोहारा येथे काँग्रेसचे हेमंत सहारे यांनी आपला गड कायम राखला. तालुक्यात भाजपाचे दोन आमदार असताना सुद्धा मोठ्या व लहान ग्रामपंचायतीवर काँग्रेस, शिवसेना, मनसेने बाजी मारली. तर भाजपाचे काही ग्रामपंचायती वगळता हार पत्करावी लागली. यावरुन सत्ताधारी भाजप पक्षाचे शेतकऱ्यांशी किती नाते आहेत व किती शेतकऱ्यांना न्याय दिला, याची खंत आमदार विजय वडेट्टीवार व माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू देवतळे यांनी व्यक्त केले.
राजुरा तालुक्यात भाजप-काँग्रेस
राजुरा : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले असून भाजपाचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे आणि काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर मामुलकर, सुभाष धोटे, जि.प. सदस्य अविनाश जाधव यांनी १४ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदारांनी ९ ग्रामपंचायतीवर दावा केला असून शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी १३ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. भाजपाने चंदनवाही, मुठरा, गोवरी, कळमना, चिंचोली (बु.), चिंचोली (खु.), कोलगाव, नलफडी, पंचाळा, सुमठाणा, वरोडा, पवनी, कढोली, कविठपेठ या ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. तर काँग्रेसने बामनवाडा, चुनाळा, कोहपरा, मुर्ती, सिंधी, धानोरा, कवीठपेठ, चिंचोली (बु.), वरोडा, पेल्लोरा, मार्डा, चार्ली, विहिरगाव, सावरी १४ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ९ गावावर आपला दावा केला आहे. शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सुद्धा १३ ग्रामपंचायतीवर युतीमध्ये दावा केला आहे. राजुरा तालुक्यात अटितटीच्या लढती झाल्या असून काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर मामुलकर, सुभाष धोटे, जि.प. सदस्य अविनाश जाधव, भाजपाचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, अरुण मस्की, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर, शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी निवडणुकीसाठी गावागावात फिरुन परिश्रम केले.
कोरपना तालुक्यात काँग्रेसची मुसंडी
गडचांदूर : कोरपना तालुक्यात पार पडलेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने ८ ग्रामपंचायतीवर बहुमत मिळवित तालुक्यात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अनेक बुथवर बहुमत प्राप्त केलेल्या भाजपाला काँग्रेसच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी जागांवर समाधान मानावे लागले. तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायतीपैकी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आवारपूर, कोडशी (बु.), पिपरी, शेरज (खु.), वनोजा, भारोसा, गाडेगाव व नोकारी (पाल) या ८ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने बहुमत सिद्ध केले. लोणी व नांदगाव या २ येथे भाजपने तर कढोली, हिरापूर, सांगोडा व तळोधी या ४ ग्रामपंचायतीवर शेतकरी संघटनेला बहुमत मिळाले. नारंडा, शेरज व भोयगाव या येथे भाजपा-शेतकरी संघटना युतीने बहुमत प्राप्त केले. १७ ग्रामपंंचायतीसाठी ११८ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी काँग्रेस ६०, शेतकरी संघटना २९, भाजपा २६ व राष्ट्रवादी काँग्रेस ३ असे तालुक्यातील पक्षीय बलाबल आहे. नारंडा, शेरज व भोयगाव या ३ ग्रामपंचायतीवर भाजपा-शेतकरी संघटना युतीने बहुमत प्राप्त केले आहे.

पोंभूर्णा तालुक्यात काँग्रेस वरचढ
पोंभूर्णा : तालुक्यात २६ ग्रामपंचातीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडे १४ तर भाजपाकडे ११ तर ग्रामविकास आघाडीकडे २ असे २७ सदस्य असल्याची चर्चा आहे. काँग्रेस पक्षाकडे १५ ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व असल्याचा दावा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ओमेश्वर पद्मगिरीवार यांनी केला आहे. २१ ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व असल्याचा दावा भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंगटीवार यांनी केला आहे. देवाडा खुर्द व वेळवा या ठिकाणी ग्रामविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसकडे सध्या चिंतलधाबा, थेरगाव, नवेगाव मोरे, केमारा, घनोटी, सातारा, चेक आष्टा, देवाडा बुज, हत्तीबोडी, कसरगट्टा, फुटाणा, चेक फुटाणी, पिपरी देशपांडे, घोसरी तर भाजपाकडे सातारा भोसले, आंबेधानोरा, उमरी पोतदार, जुनगाव, फुटाणा मोकासा, चक फुटाणा, चकठाणा, चवा, ठाणेवासना, भिमणी, घाटकुळ, आष्टा, बळारपूर, मोहाळा रै. या ग्रामपंचायतीवर वर्चस्व राहणार असल्याचे समजते.
बल्लारपूर तालुक्यात काँग्रेसची सरशी
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे), कळमना, आमडी, कोर्टीमक्ता, पळसगाव, मानोरा, किन्ही, हडस्ती व गिलबिली येथील एकूण ९२ जागांपैकी ६५ जागा काँग्रेस प्रणित आघाडीच्या उमेदवारांनी काबीज केल्या. विसापूर येथील उमेदवारांनी प्रभाग सहामध्ये फेरमतमोजणी करण्यात आली. ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून एका महिला उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. एकूण १० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात हडस्ती येथील मंगेश ढोबे, शंकुतला ढोबे, कळमना येथे सुनिता उरकुडे, कोर्टीमक्ता येथे चंदा सोयाम, गिलबिली येथे वनिता पेंदोर व सुवर्णा गेडाम यांनी यापूर्वीच अविरोध निवड झाली. आजच्या निकालात सर्वात मोठ्या विसापूर ग्रामपंचायतीत काँग्रेस प्रणित आघाडीचे १७ पैकी ८ उमेदवार विजयी झाले. भाजपाप्रणित आघाडीला ५ तर अपक्ष उमेदवारांनी ४ जागेवर विजय मिळविला. नांदगाव (पोडे) येथे काँग्रेसच्या गोविंदा पोडे यांच्या आघाडीने ११ पैकी ११ जागा जिंकून माजी जि.प. सदस्य मनोहर देऊळकर यांच्या भाजपाप्रणित आघाडीचा दारुण पराभव केला. विसापूर येथे प्रभाग एक मधून सचिन टोंगे, रिता जिलठे, शारदा डाहुले, प्रभाग दोनमधून प्रमोद ठाकूर, निता वनकर, प्रभाग तीनमध्ये विजय वैद्य, सुनील टोंगे, सुरेखा कोडापे, प्रभाग चारमध्ये अनंता कन्नाके, शशीकला जीवने, सुरेखा इटनकर, प्रभाग पाचमध्ये बुद्धीमान कांबळे, सरिता झाडे तर प्रभाग सहामध्ये उज्वला कोडापे, अशोक थेरे व मीना जुमनाके ईश्वर चिठ्ठीने विजयी झाल्या. नांदगाव (पोडे) येथील ग्रामपंचायतमध्ये प्रभाग एक मधून गोविंदा पोडे, अनिता हस्ते, रेखा मिटपल्लीवार, प्रभाग दोन मधून प्रमोद देठे, विनीता कोरवते, प्रभाग तीन मधून संतोष रोहणकर, मल्लेश कोडारी, नंदा गोहणे तर प्रभाग चारमधून सुनील शेडे, वैशाली उपरे व संध्या निमकर हे विजयी झाले.
सावलीत काँग्रेस-राकाँचा झेंडा
सावली : तालुक्यात काँग्रेसने २५ ग्रामपंचायतीवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने १८ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले आहे. मात्र भाजपाला केवळ ५ ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. साखरी येथील सुनंदा गेडाम यांना ईश्वर चिठ्ठीने विजयी घोषित करण्यात आले. ५० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ३ अविरोध तर ४७ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली.
काँग्रेसचे नेतृत्त्व ब्रह्मपुरी- सावली विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. राष्ट्रवादीचे नेतृत्व संदीप गड्डमवार तर भाजपाचे नेतृत्त्व जिल्हाध्यक्ष व माजी आमदार प्रा. अतुल देशकर आणि खा. अशोक नेते यांच्याकडे होते. (लोकमत चमू)
ब्रह्मपुरी तालुक्यात भाजप व काँग्रेसचा दावा
ब्रह्मपुरी : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीपैकी अनेक ग्रामपंचायतींवर भाजपा कब्जा केला असून काही ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा वरचष्मा दिसून आले. भाजपाने गांगलवाडी, मेंडकी, किन्ही, पिंंळगाव, चिखलगाव, नांदगाव, खंडाळा, जुगनाळा, मांगली, नान्होरी, रुई, उदापूर, दिघोरी, भालेश्वर, अऱ्हेरनवरगाव, लाडज, सोनेगाव, बेटाळा, बोरगाव, चिंचोली, चारेटी, हरदोली, रामपूरी, आवळगाव, चिचगाव, लाखापूर, चांदली, कोलारी, सायगाव तर काँग्रेसने एकारा, भूज, किटाळी, हळदा, निलज, बरडकिन्ही, आक्सापूर, मुई, पारडगाव, मालडोंगरी, तुल्हान मेंढा, रणमोचन, अड्याळ (जाणी), वांद्रा, खेड (मक्ता), चांदगाव, बेलगाव, सावलगाव, जवराबोडी (मेंढा), झिलबोडी, कोसंबी, पाचगाव, गोगाव, वायगाव येथे वर्चस्व मिळविले. तर संमिश्र ग्रामपंचायतीमध्ये मुडझा, चौगान, रानबोथली, कुडेसावली, बोडधा, बोढेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, ग्रामविकास आघाडी, कॅम्युनिस्ट पार्टी आदींचा समावेश आहे.
गांंगलवाडीत माजी सरपंचांचा पराभव
मेंडकी ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला असून तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव थानेश्वर कायरकर व तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष व माजी सरपंच मंगला लोनबले यांचा दारुण पराभव झाला. तर गांगलवाडीमध्ये तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर यांचे पुत्र माजी सरपंच संदीप सेलोकर यांनाही दारुण पराभव पत्करावा लागला.
तीन ग्रामपंचायतींमध्ये ईश्वर चिठ्ठीने निकाल
दिघोरी ग्रामपंचायतीमध्ये वार्ड नं.१ मध्ये प्रभाकर शेंडे व गोपाल दिघोरे यांना ९६ अशी समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीने प्रभाकर शेंडे यांचा विजय झाला. बेलगाव ग्रामपंचायतीमध्ये जयमाला अवसरे आणि विद्या धोटे यांना समान मते मिळून ईश्वरचिठ्ठीने विद्या धोटे विजयी झाल्या. उदापूर ग्रामपंचायतीमध्ये सुषमा नाकतोडे व वैशाली नाकतोडे यांना समान मते मिळाली त्यात ईश्वरचिठ्ठीने सुषमा नाकतोडे विजयी झाल्या.

 

 

 

Web Title: The results of many Gram Panchayats are shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.