सूर्याच्या प्रकोपाचा जनजीवनावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 01:00 IST2016-04-24T01:00:52+5:302016-04-24T01:00:52+5:30
चंद्रपूर जिल्हा मागील तीन दिवसांपासून अक्षरश: होरपळून निघतो आहे. सूर्याचा पारा ४५ अंशापार गेला आहे.

सूर्याच्या प्रकोपाचा जनजीवनावर परिणाम
ओकतोयं आग : दाहकतेसोबतच पाणी प्रश्नही तीव्र
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मागील तीन दिवसांपासून अक्षरश: होरपळून निघतो आहे. सूर्याचा पारा ४५ अंशापार गेला आहे. शनिवारी ४३.६ तापमानाची नोंद झाली असली तरी मागील दोन दिवस जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक गाठला होता. या वाढत्या तापमानाचा नागरिकांनी धसका घेतला असून जनजीवनच विस्कळीत झाले आहे. याशिवाय पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न तीव्रतेने उभा ठाकला आहे.
‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. सर्वाहून अधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातच होत असते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच राहणार, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. फेब्रुवारीपासूनच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागतात, असा अनुभव दरवर्षीच नागरिकांना येतो. मात्र यावेळी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे तापमान घटले होते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहून यावर्षी उशिराने लागली. मात्र अवकाळी पावसाचा गारवा फार काळ टिकला नाही. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऊन्ह तापू लागले.
आता एप्रिल महिना लागताच सुर्याने आपला प्रकोप दाखविणे सुरू केले आहे. एप्रिल महिन्याचा पंधरवाडा लोटल्यानंतर तर सुर्याने अक्षरश: आग ओकणे सुरू केले आहे. गुरुवारी चंद्रपुरात ४५.५ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी ४५ अंश सेल्सीयस तापमान नोंद करण्यात आले. याच दिवशी ब्रह्मपुरीला सूर्याचा पारा तब्बल ४६ अंशापर्यंत गेला होता.
या वाढत्या उष्णतामानामुळे जवजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी ९ वाजतापासून उन्हाचे चटके असह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. सध्या काही शाळा-महाविद्यलयांनाही सुट्या लागल्या असल्याने दुपारी शहरात निरव शांतता पसरल्याचे दिसून येत आहे. नागरिक सायंकाळीच बाहेर निघणे पसंत करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तिघांचा उष्माघाताने मृत्यूही झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाचा चांगलाच धसका घेतला आहे. (शहर प्रतिनिधी)
उन्हाळ्यातील विशेष दुकाने
उन्हापासून बचाव करण्यासाठी नानाविध क्लुप्त्या लढविल्या जात आहे. तोंडाला दुपट्टा बांधल्याशिवाय कुणीच बाहेर निघत नाही. त्यामुळे दुपट्यांच्या दुकानांना सुगीचे दिवस आले आहे. ठिकठिकाणी ऊसाचा रस, नारळ पाणी, ताड, लिंबू पाणी यांची दुकाने लागली आहेत. थंडा आईस गोला, कुल्फी यांचीही दुकाने रस्त्यावर दिसून येत असून या दुकानांमध्ये नागरिकांचीही झुंबड दिसून येत आहे.
ग्रामीण भागात पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष
यंदा पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जलाशय, नदी, तलाव-बोड्यात पाणी साठले नाही. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भिषण टंचाई जाणवत आहे. एका गावातील एकाच विहिरीवर दोन गावातील गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाही.
‘मे’ हीटचा धसका
एप्रिल महिन्यातच सूर्याने नागरिकांच्या नाकीनऊ करून टाकले आहे. तप्त सूर्यकिरणे असह्य होत आहेत. एप्रिल महिन्यातच हे हाल आहेत तर पुढे मे महिन्यात कसे होईल, याचा धसका चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आतापासून घेतला आहे. मे महिन्यात येणाऱ्या उष्णतेची लाटेचा सामना कसा करावा, या चिंतेत चंद्रपूरकरांची झोप उडाली आहे.