बल्लारपूर तालुका निर्मल करण्याचा संकल्प
By Admin | Updated: December 10, 2014 22:55 IST2014-12-10T22:55:13+5:302014-12-10T22:55:13+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वच्छ भारत मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा

बल्लारपूर तालुका निर्मल करण्याचा संकल्प
बल्लारपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वच्छ भारत मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी ग्रामीण भागाचा दौरा केला. पहिल्या टप्प्यात बल्लारपूर तालुका निर्मल करण्याचा संकल्प करून विसापूर, चुनाभट्टी, बामणी (दुधोली) व काटवली (बामणी) गावातील लोकांच्या भेटी घेऊन लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नामुळे लोकचळवळ निर्माण झाली असून लोकप्रतिनिधी शौचालयासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहित करीत असल्याचे चित्र आहे.
रविवार सुटीचा दिवस असल्याने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मजेचा दिवस असतो. मात्र याला फाटा देत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रवींद्र मोहिते, कृष्णकांत खानझोडे, संजय धोटे यांचा ताफा पहिल्यांदा विसापूरला धडकला. जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, सरपंच बंडू गिरडकर, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच शाम वैद्य यांच्यासह चर्चा करून प्रस्तावित शौचालय बांधकामाची पाहणी केली. बामणी (दुधोली) येथे सरपंच सुजाता टिपले, माजी सभापती हरिष गेडाम, ग्रामपंचायतीच्या सदस्य सत्यशीला साळवे व निर्मल दूत यांच्या समवेत बैठक घेऊन वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी कोणत्याही स्थितीत लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित न ठेवण्याचे निर्देश संवर्ग विकास अधिकारी गजभे व ग्राम विकास अधिकारी ढुमणे यांना देण्यात आले. काटवली येथे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, माजी उपसभापती सुमन लोहे, सरपंच माधुरी ढुमणे आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)