दारूमुक्त करण्याचा संकल्प
By Admin | Updated: October 19, 2015 01:32 IST2015-10-19T01:32:52+5:302015-10-19T01:32:52+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंद झाली असली तरी राजुरा तालुक्यातील विरूर येथे मागील सहा महिन्यांपासून छुप्या मार्गाने हातभट्टी,

दारूमुक्त करण्याचा संकल्प
महिला झाल्या आक्रमक : पोलीस ठाण्यातच घेतली सभा
विरूर (स्टे) : चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंद झाली असली तरी राजुरा तालुक्यातील विरूर येथे मागील सहा महिन्यांपासून छुप्या मार्गाने हातभट्टी, मोहफूल व देशी-विदेशी दारूची अवैध विक्री जोमाने सुरू आहे. दारूच्या आहारी गेलेल्यांचे सुखी कुटूंब उद्ध्वस्त झाले आहेत. दरम्यान, विरूर (स्टे) येथील महिलांनी एकत्र येऊन महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर मोरे, सरपंच भास्कर सिडाम व विरूरचे ठाणेदार यांच्या पुढाकाराने पोलीस ठाण्यात सभा आयोजित करून विरूरात चाललेले अवैध दारू विक्री बंद करण्याचा संकल्प केला.
गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदारांनी केले असून यामुळे अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंद झाल्यापासून अवैधरीत्या छुप्या मार्गाने हातभट्टी, मोहफुल व देशी-विदेशी दारू विक्रीत सतत वाढ होत असल्याने गावातील मोठ्यांबरोबर तरुण व अल्पवयीन मुलेसुद्धा दारूच्या आहारी जात आहे. येथे बहुतेक जनता गरीब, आदिवासी, शेतमजूर, शेतकरी आहेत. मोलमजुरी करून पोट भरणारे गरीब जनता मजुरीचे पुर्ण रक्कम दारूमध्ये घालवित आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावात दररोज तंटे, झगडे, कौटुंबीक कलह निर्माण होऊन अनेकांचे संसार कोलमडण्याच्या अवस्थेत आहेत. सतत वाढ होत असलेल्या अवैध धंद्यावर आळा घालण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत आहे. यावर उपाययोजना करण्याकरिता विरूर येथील ठाणेदार, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांना बोलावून दारू व इतर समस्याबाबत चर्चा केली. तेव्हा गावातील महिलांनी वर्ग व नागरिक ठाण्यासमोर सभा आयोजित केली. यात गावातील २५० ते ३०० महिला उपस्थित होते. यात ठाणेदारांनी दारूचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. गावातील अवैध दारू पुर्णपणे बंद करण्यासाठी गावातील नागरिकांची व महिलाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. दारू कोणत्या वार्डात व मोहल्यात विकली जात आहे. हे आम्हाला कळवून सहकार्य केल्यास दारू बंद होण्यास मदत होईल, असे सांगीतले.
तसेच गावात पोलीस मित्र तयार करून गावात चालण्याच्या अवैध धंद्यावर आळा बसेल, असेही सांगीतले. यावर उपस्थित महिलांनी अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत होकार दिला. यामुळे अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आता विरूरातील अवैध दारू बंदी होईल काय, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)