दुधवाहीच्या जलसेतूमधून पाणी सोडा- अशोक नेते
By Admin | Updated: August 5, 2015 01:10 IST2015-08-05T01:10:14+5:302015-08-05T01:10:14+5:30
शेतकरी सध्या दुष्काळाचे चटके सोसत आहे. पाण्याअभावी पिके सुकत चालली आहेत.

दुधवाहीच्या जलसेतूमधून पाणी सोडा- अशोक नेते
अधिकाऱ्यांना निर्देश : विविध समस्या लागणार मार्गी
ब्रह्मपुरी : शेतकरी सध्या दुष्काळाचे चटके सोसत आहे. पाण्याअभावी पिके सुकत चालली आहेत. पीके जागविण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी दुधवाही जवळच्या जलसेतूमध्ये सोडण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.
पावसाची सद्य:स्थिती विचारात घेऊन जेवढे शक्य होईल, तेवढी मदत शासन देणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील समस्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ब्रह्मपुरी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याच्या कामालाही सुरुवात होईल. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची मुदत ७ आॅगस्टपर्यंत सरकारने वाढविली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांची घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या भागाचा विकास करण्यासाठी यापूर्वी चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर आहेत. आता एक नव्या पाचव्या महामार्गाचीही परवानी मिळाली आहे. तो मार्ग ब्रह्मपुरी- वडसा- देवरी- गोंदिया असा राहणार आहे. शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपवर शेतकऱ्यांना आता कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे नेते यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला माजी आमदार अतुल देशकर, नगराध्यक्ष रिता उराडे, दीपक उराडे, संजय गजपुरे, परेश शहादाणी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)