पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर
By Admin | Updated: December 11, 2014 23:03 IST2014-12-11T23:03:40+5:302014-12-11T23:03:40+5:30
इरई व झरपट नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील बाराशे घरमालकांना मनपाने नोटीस बजावून घरे स्वत:च पाडावे, अन्यथा बुलडोजर चालविला जाईल, असा इशारा दिला आहे. असे असले तरी यातील

पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर
नगरपालिकेने दिली परवानगी
चंद्रपूर : इरई व झरपट नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील बाराशे घरमालकांना मनपाने नोटीस बजावून घरे स्वत:च पाडावे, अन्यथा बुलडोजर चालविला जाईल, असा इशारा दिला आहे. असे असले तरी यातील बहुतांश रहिवाशांना तत्कालीन नगरपालिकेनेच बांधकामाची परवानगी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील रहिवाशी घरे सोडायला तयार असल्याचे दिसत नाही. अशा परिस्थितीत या रेड व ब्ल्यू लाईन क्षेत्रातील रहिवाशी भाग खाली करण्यासाठी तेथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर शहरातून इरई व झरपट या नद्या वाहतात. फार पूर्वी या नद्या रहिवाशी क्षेत्राच्या दूर होत्या. मात्र सुमारे ३० ते ४० वर्षापूर्वीपासून या क्षेत्रात नागरिकांनी कच्ची घरे बांधली. याचवेळी नगरपालिकेने त्यांचे अतिक्रमण हटविणे अपेक्षित होते. मात्र नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. यातील काही लोकांनी त्यावेळी खुद्द नगरपालिकेलाच घरे बांधकामाची परवानगी मागितली होती. त्यावेळी हे क्षेत्र पुरबुडित क्षेत्र आहे, हे माहित असतानाही नगरपालिकेने अनेकजणांना या क्षेत्रात बांधकामाची परवानगी दिली.
आता महानगरपालिकेला अचानक पण उशिरा जाग आली. मनपाने इरई व झरपट नदीच्या पूरपुडित क्षेत्रातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या प्रथम सत्रात मनपाने सिस्टर कॉलनी, जगन्नाथबाबा नगर, हवेली गार्डन परिसर, रहमतनगर येथील एक हजार २०० घरमालकांना नोटीस बजावली आहे. त्यानंतर झरपट नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील शेकडो रहिवाशांनाही मनपाने नोटीस बजावली आहे. (शहर प्रतिनिधी)