चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी ४३ लाख वृक्ष लागवड

By Admin | Updated: July 8, 2017 00:37 IST2017-07-08T00:37:32+5:302017-07-08T00:37:32+5:30

गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यपूर्ण परिश्रम करणाऱ्या वनविभाग व अन्य सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नाला यश आले असून...

A record 43 lakh trees have been planted in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी ४३ लाख वृक्ष लागवड

चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी ४३ लाख वृक्ष लागवड

उद्दिष्ट ओलांडले : नागरिकांसह सर्वच विभागांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यपूर्ण परिश्रम करणाऱ्या वनविभाग व अन्य सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नाला यश आले असून जिल्ह्यात वनमहोत्सवाच्या समारोपाला चंद्रपूर जिल्ह्याने ४३ लाख वृक्ष लागवडीचा विक्रम केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणेने यावर्षी विक्रम केलेला आहे. वनविभाग, सामाजिक वनिकरण, वनविकास महामंडळ, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विविध उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था, खाजगी व्यक्ती यांच्याकडून २९ लाख १७ हजार ८८३ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित झाले होते. मात्र या शासकीय आकडयाला पार करत संपूर्ण जिल्ह्याने ४३ लाख २२ हजार ३२६ वृक्षांची लागवड केली आहे. तब्बल १४ लाख चार हजार ४४३ वृक्षांची अतिरिक्त लागवड केली आहे. वनविभागाकरिता १२ लाख ७६ हजार उद्दिष्ट होते. वनविभागाने १७ लाख ३७ हजार वृक्ष लागवड केली आहे. वनविकास महामंडळला आठ लाख ८१ हजार ८८३ उद्दिष्ट होते. त्यांनी १४ लाख ८५ हजार २०४ रोपांची लागवड करुन सहा लाख अतिरिक्त वृक्ष लागवड केली आहे. यासाठी महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. जिल्हा परिषदेने यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात ५० गावांमध्ये वृक्षदिंडी काढून वातावरण निर्मिती केली होती. जिल्हा परिषदेने स्वत:च तीन लाख ८० हजारांचे उद्दिष्ट घेतले होते. त्यांनी चार लाख ९२ हजार ५१० वृक्ष लागवड करुन विक्रम केला आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे व त्यांच्या चमूने यासाठी प्रयत्न केले असून सर्व ग्रामपंचायतीच्या उत्साहातील सहभागाबद्दल आभार मानले आहे. शिक्षण विभागानेही आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत १२ हजार ५०० चे उद्दिष्ट असताना ४४ हजार ४०० वृक्ष लागवड केली आहे. महावितरण व विद्युत विभागाच्या सर्व कंपन्यांनी मिळून यावेळी सात हजार ८०६ रोपे लावली आहे.
महानगरपालिकेनेदेखील १५ हजारांच्या शासकीय उद्दिष्टाला ३० हजारापर्यंत वाढवून घेतले होते. या पलिकडे जात त्यांनी सात दिवसात ३३ हजार ८१८ झाडे लावण्याची किमया केली आहे. महापौर अंजली घोटेकर व मनपा आयुक्त संजय काकडे यांनी यासाठी पुढाकार घेतला होतो. विशेष म्हणजे, ही आकडेवारी आॅनलाईन नोंदणी झालेली आहे. याशिवाय जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केलेल्या वृक्ष लागवडीच्या मिशनला सर्वस्तरातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आज शुक्रवारी शेवटच्या दिवशी पोलीस विभागाने कोठारी परिसरात मोठी वृक्षदिंडी काढली होती. यामध्ये सामान्य नागरिकांचा मोठया प्रमाणात सहभाग होता. जिल्हयाच्या विविध भागात ग्रामपंचायती, शाळा, शासकीय कार्यालयांमध्ये मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. जिल्हा उपनिंबधक कार्यालयाच्या वतीने बल्लारपूर पेपर मिलमध्ये कर्मचारी सहकारी संस्थेच्या सहकार्याने मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली.
या विभागाने आपले १३ हजारांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून शैक्षणिक संस्था, नगरविकास, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, उद्योग विभाग यांनी आपले उद्दिष्ट पार केले आहे.

वनमंत्र्यांकडून गृहजिल्ह्याचे कौतुक
पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना यासाठी शाब्बासकी दिली असून गेल्या काही महिन्यांपासून व प्रत्यक्ष गेला आठवडाभर केलेल्या प्रचंड मेहनतीचे कौतुक केले आहे. गृह जिल्ह्यातून या मोहिमेला जे आत्मबळ मिळाले त्याला मी विसरु शकत नाही. प्रत्येक मिशनमध्ये चंद्रपूर जिल्ह्याने कायम पाठबळ दिले असून यावेळी २९ लाखांच्या उद्दिष्टाला ४३ लाखांचे भरीव योगदान कायम स्मरणात राहील, असे स्पष्ट केले आहे.

Web Title: A record 43 lakh trees have been planted in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.