आबांच्या आठवणी चंद्रपूरकरांच्या मनात

By Admin | Updated: February 17, 2015 01:29 IST2015-02-17T01:29:54+5:302015-02-17T01:29:54+5:30

बल्लारपूर: सन २००६ ला वर्धा नदीला मोठा पूर आला होता. पूराचे पाणी येथील खोलगट भागात शिरल्यामुळे

Recollection of the memory of Chandrapurkar's mind | आबांच्या आठवणी चंद्रपूरकरांच्या मनात

आबांच्या आठवणी चंद्रपूरकरांच्या मनात

बल्लारपूरच्या पूरग्रस्तांना
दिला होता दिलासा
बल्लारपूर:
सन २००६ ला वर्धा नदीला मोठा पूर आला होता. पूराचे पाणी येथील खोलगट भागात शिरल्यामुळे त्यात बरेच घरांची पडझड होऊन मोठी हानी झाली होती. त्यावेळेला आर आर पाटील ऊर्फ आबा हे राज्याच्या गृहमंत्री पदावर होते. यापूरप्रसंगी आबांनी या भागाचा दौरा करुन पूरस्थितीची पाहणी केली. येथील गणपती वॉर्डात फिरुन, पाणी शिरलेल्या घरांमध्ये जावून पूरस्थिती व त्यामुळे झालेले नुकसान याची स्थिती प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली. पूरग्रस्तांशी बोलून, त्यांचे दु:ख ऐकून घेऊन त्यांना धीर दिला आणि शासनाकडून सर्वपरी नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन लोकांना दिले. या पाहणी दौऱ्यात त्यांचेसोबत असलेल्या अधिकाऱ्यांना पूरग्रस्त भागाचा लवकरात लवकर सर्वे करा असे आदेश तिथल्या तिथे दिले. या सोबतच त्यांनी चंद्रपुरातील पठाणपूरा भाग, हडस्ती, पिंपरी या पूरग्रस्त भागाची ही पाहणी केली, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पूरग्रस्तांना मदत करा असे आवाहन त्यांनी केले होते.
शोककळा
चंद्रपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राची मोठी हाणी झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.
गरीबीतून वर आलेले आणि सर्वसामान्यांना घेऊन चालणाऱ्या आबांच्या जाण्याने खुपमोठे दु:ख झाले आहे. १९९० पासून एकत्र काम केले. आपण एका चांगल्या माणसाला मुकलो आहोत. पक्ष वेगळा असला तरी त्यांच्याशी संबंध चांगले होते.
-शोभाताई फडणवीस,
आमदार (विधान परिषद)
आबांच्या निधनाने राज्याच्या विकासाची मोठी हानी झाली. त्यांचे व्यक्तीमत्त्व पक्षापुरतेच मर्यादीत नव्हते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची त्यांना जाण होती. कोणत्याही पक्षाचा असो त्यांनी कधी पक्षपात केला नाही. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले आबा असामान्य होते.
- बाळू धानोरकर, आमदार
राष्ट्रवादी काँग्रेसने एक अभ्यासू नेता गमावला आहे. विधानसभेत माझी पहिल्यांदाच भेट झाली होती. त्यांचे भाषण ऐकायला मिळाले. ते अंत्यत हुशार आणि अभ्यासू व्यक्तीमत्व होते. गडचिरोली जिल्ह्यासारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले.
-संजय धोटे, आमदार
आर. आर. पाटील हे सर्वसामान्यांचे नेते होते. सभागृहात अत्यंत पोटतिडकीने ते मुद्दा मांडायचे. एवढेच नाही तर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देखील तेवढ्याच संमयाने द्यायचे.
-नाना श्यामकुळे, आमदार
महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला मुकला आहे. राष्ट्रवादी काँगेसच नाही तर महाराष्ट्राचेही मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. राजकारणात आबांसारखे नि:ष्पृह नेते लाभणे हे खरोखरच भाग्याचे असते.
-बंटी भांगडिया, आमदार
आबांच्या निधनामुळे संपुर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. त्यांनी राज्यात अनेक महत्वपुर्ण योजना राबविल्या. त्यांनी तंटामुक्त गाव योजनेसारख्या सामाजिक योजना राबवून जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
- राजेंद्र वैद्य, जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस
सामान्य कार्यकर्त्यांचा लोकनेता हरपला. प्रतिकूल परिस्थतीवर मात करून वर आलेला नेता, सामान्य कार्यकर्त्यांची जाण असलेला नेता आज आपल्यातून निघून गेला.
-संजय वैद्य, नगरसेवक, चंद्रपूर
आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे दु:ख झाले. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्यांची प्रतिमा होती.
-राखी कंचर्लावार,महापौर.
आबांच्या निधनामुळे संपुर्ण महाराष्ट्राची हाणी झाली आहे. स्वच्छ प्रतिमेचा नेता हरपला. त्यांनी मला दिलेली शाबासकी माझ्यासाठी कौतुकाची थाप होती. मन मिळावू , पक्षाच्या बाहेर जाऊन जणसामान्यांचे काम करणारा नेता हरपला.
- अतुल देशकर, माजी आमदार
गरिबांचा कैवारी, सामान्य कार्यकर्त्यांबाबत आपुलकी बाळगणारा नेता काळाच्या पडद्याआड झाल्याने महाराष्ट्राची हाणी झाली आहे.
-सुभाष धोटे, माजी आमदार.
चांगला वक्ता, सामान्य कुटूंबातून आलेला थोर माणूस आपल्यातून गेला. गृह खात्याला वेगळी दिशा त्यांनी दिली. सर्वसामान्यांचे ते लाडके नेते होते.
- शेखर धोटे, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँॅक, चंद्रपूर
चांगल्या व्यक्तीमत्वाचे धनी, गृहमंत्री म्हणून चांगली कामगिरी त्यांनी पार पाडली. त्यांनी चांगल्या योजना समाजासाठी राबविल्या.
-संध्या गुरूनुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद चंद्रपूर.
अत्यंत साधेपणाने आणि निगर्वीटपणाने जगणारे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले. राजकारणात अंत्यत संवेदनशिल व्यक्ती म्हणून ते जमले. सर्वांना घेऊन चालणारा नेता हिरावला.
- गोविंद भेंडारकर, संयोजक गोसीखुर्द प्रकल्प संघर्ष समिती.
महाराष्ट्राला आबांसारख्या सालस नेतृत्वाची गरज होती. पक्षाच्या पलिकडे जाऊन त्यांनी सर्वांशीच स्नेहसंबध जोडले. गडचिरोली जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम सर्वसामान्यांना दिलेला न्याय आहे. हे जणता विसरू शकत नाही.
-प्रकाश देवतळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
आबा हे सर्वसामान्यांचे नेते होते. विकासकार्यात ते नेहमी तत्पर असायचे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी मागून घेतले होते. या काळात त्यांनी पक्षबांधणी आणि कार्यकत्यांची फळी निर्माण केली.
- प्रकाश पाटील मारकवार

Web Title: Recollection of the memory of Chandrapurkar's mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.