हात गमावलेल्या रत्नपालला शासकीय मदतीची आस
By Admin | Updated: May 19, 2014 23:24 IST2014-05-19T23:24:24+5:302014-05-19T23:24:24+5:30
तो एके दिवशी मांडवावरून अचानक खाली पडला. लहानगे वय असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले. उपचार सुरू झालेत.

हात गमावलेल्या रत्नपालला शासकीय मदतीची आस
हरदोना : तो एके दिवशी मांडवावरून अचानक खाली पडला. लहानगे वय असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले. उपचार सुरू झालेत. खासगी डॉक्टरांनी हात मोडल्याचे निदान केले. त्याच्या घरची परिस्थिती हातावर आणून पानावर खाण्याइतकी बिकट असल्याने खासगी डॉक्टरांचा खर्च परवडण्यासारखा नव्हता. मात्र काळजाच्या तुकड्यासाठी पै-पै जोडून पालकांनी उपचारासाठी पैसा उभा केला. परंतु नशिबानेच दगा दिल्याने दाद मागायची कुणाकडे, अशी विपरित परिस्थिती त्याच्या कुटुंबावर ओढवली. हात सडल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यानंतर त्याचा हातच कापावा लागला. परिणामी विकलांग झालेल्या त्या युवकाला शासकीय मदतीसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. रत्नपाल सुंदर कुळमेथे (२०) असे युवकाचे नाव असून तो आसेगाव (ता. पोंभूर्णा) येथील रहिवासी आहे. त्याचे कुटूंब कामाच्या शोधात राजुरा तालुक्यातील गोवरी येथे आले आहेत. घरी अठराविश्वे दारिद्र्य असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वडील ‘सालगडी’म्हणून दुसर्याकडे काम करतात. दोन भाऊ, एक बहिण, आई-वडील एवढे रत्नपालचे कुटुंब. रत्नपाल नऊ वर्षाचा असतानाच एके दिवशी अचानक मांडवावरुन खाली पडला. तेथूनच रत्नपालच्या आयुष्याची पडझड व्हायला सुरुवात झाली. लहान असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. परिस्थिती हलाखीची असल्याने घरी पैसा नव्हता. मात्र काळजाच्या तुकड्यासाठी उसनवारीने पैसा आणून रत्नपालवर एका खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. आठवडाभर रुग्णालयात भर्ती ठेवल्यानंतर पन्नास हजारावर अधिक खर्च झाला. जमवून ठेवलेली तुटपूंजी मिळकत रत्नपालच्या उपचारावर खर्च झाली. पैशाची जमवाजमव करून दवाखान्याचा खर्च परतफेड करण्यात आला. मात्र पोटच्या मुलासाठी एवढा खटाटोप करूनही हाताची गंभीर दुखापत वाढत गेली. पुढील उपचाराचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न कुटुंबासमोर उभा ठाकला. रत्नपालच्या हाताची दुखापत गंभीर होत गेल्याने त्याचे शिक्षण अर्ध्यावरच थांबले. रत्नपाल उपचाराला कोणताच प्रतिसाद देत नसल्याने त्याचा हात सडायला लागला. एकापाठोपाठ एक संकटाचा डोंगर कुळमेथे कुटुंबासमोर उभा ठाकला. रत्नपालचा हात पूर्णत: सडल्याने त्याचा डावा हात कापावा लागल्याचे निदान डॉक्टरांनी केल्यावर आई-वडीलांच्या पायाखालची जमीन सरकली. हात कापला नाही तर त्याचा शरीरावरही परिणाम होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर रत्नपालच्या शस्त्रक्रियेसाठी पैशाची जुळवाजुळव करून हात कापण्यात आला. एक हात गमावलेल्या रत्नपालने कसे बसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. समोरच्या शिक्षणासाठी घरची परिस्थिती आड आली. कोणतेही काम करण्यासाठी सशक्त शरीराची गरज असते. रत्नपालला मात्र सर्व कामे एकाच हाताने करावी लागतात. रत्नपाल विकलांग असल्याने त्याला सामान्य माणसाप्रमाणे काम करता येत नाही. एक हात असल्याने त्याला रोजगारासाठी कुणीही बोलावत नाही. परिस्थिती हलाखीची असल्याने उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न बनला आहे. रत्नपालने शासकीय मदतीसाठी अनेकदा कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. (वार्ताहर)