राखींचाही ट्रेंड बदलला

By Admin | Updated: August 29, 2015 01:21 IST2015-08-29T01:21:32+5:302015-08-29T01:21:32+5:30

विविध छटांतील आकर्षक रंग, गोल सोनेरी रंगाचे चकाकणारे वलय, आकाराने मोठ्या, डोळ्यात भरतील अशा टपोऱ्या राख्या पूर्वी सर्वत्र बघायला मिळत.

Rakhi also changed the trends | राखींचाही ट्रेंड बदलला

राखींचाही ट्रेंड बदलला

वसंत खेडेकर बल्लारपूर
विविध छटांतील आकर्षक रंग, गोल सोनेरी रंगाचे चकाकणारे वलय, आकाराने मोठ्या, डोळ्यात भरतील अशा टपोऱ्या राख्या पूर्वी सर्वत्र बघायला मिळत. अशा राख्यांनी राखी विक्रीची दुकाने सजत असे. आता मात्र राख्यांचा ट्रेंडच बदलला आहे. अतिशय नाजुक आणि लहान राख्यांना पसंती दर्शविली जात आहे.
‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ हे भावपूर्ण गाणे म्हणत आपल्या भाऊरायाच्या हाताला मोठ्या आकाराची रेशमी धाग्याची राखी बांधतांना ‘छोटी बहन’ या चित्रपटात बेबी नंदाला, तर अशोक कुमार, वहिदा रहमान आणि प्रदीप कुमार यांची भूमिका असलेल्या ‘राखी’ या चित्रपटात ‘बंधा हुआ एक एक धागेमें भाई बहन का प्यार’ या शिर्षक गीताप्रसंगी दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेते शिवाजी गणेशन यांच्या रांगड्या हाताला शोभेसी मोठ्या आकाराची राखी बांधतांना दाखविले होते.
आकाराने जेवढी मोठी राखी तेवढीच मोठी तिची किंमत, असे आधी होते. स्पंज आणि त्यावर देखण्या घडीतील रेशमी कापड अशा विविध रंगाच्या मोठ्याला राखींची मागणी होती. बहीण व भावांना तशाच राख्या आवडायच्या. अशा राख्या ठसठसीत दिसत. त्यांनी हात शोभून दिसे. राख्यांचा आकार गोलच असायचा. राख्यांची सजावट आकर्षक असायची. राखींवर कारागिर प्रासंगिकता उमटवीत असत. त्या त्या वर्षातील अत्यंत महत्वाच्या चर्चित आणि जनमाणसावर प्रभाव पाडणाऱ्या धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांशी संबंधित चित्र, नाव वा घोषवाक्य याचा आपापल्या पद्धतीने उल्लेख असायचा. टीवी वर ‘रामायण’ तसेच ‘महाभारत’ या मालिका अत्यंत लोकप्रिय ठरल्या होत्या. त्या दोन वर्षात या नावांनी सजलेल्या राखी बाजारात आल्या होत्या. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशप्रेम ओसंडून वाहात होता. त्या अनुषंगाने राखींवर भारत माताची प्रतिमा तसेच जयहिंद अंकित करण्यात आले होते. भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी दिलेल्या ‘जय जवान जय किसान’ तसेच ‘मेरा भारत महान’ या घोषणांना राखी निर्मात्यांनी राखीवर ही घोषणा उचलून धरली होती, प्रचंड चाललेला शोलेही राखीवर उमटला होता. बाल गोपालांना आवडणारे खेळणे, टीव्हीवरील त्यांचे आवडते चमत्कारीक पात्रही राखीतून सुटले नाहीत. राखींचा त्याकाठी आकारच तेवढा मोठा असायचा. मात्र काही वर्षांपासून राखींच्या आकारात आणि एकंदरीत बनावटीत फरक पडत गेला. आता टपोऱ्या आकाराच्या राख्या बनणेच बंद झाले आहे. त्यांची जागा लहान आणि लांबट पद्धतीच्या राखींनी घेतली आहे. आज बाजारात लहानच राख्या आढळतात. वेगवेगळ्या प्रकाराच्या मनी व मोती यांनीच बनविलेल्या हारासारख्या राख्या दिसून येतात. या छोट्या आकाराच्या राख्यांमध्ये मोठ्या राख्यांप्रमाणे घोषणा वा कुणाचे चित्र याकरिता जागाच उरत नाही. त्यामुळे, आताच्या या राख्यांमध्ये तो प्रकार आढळत नाही. (तालुका प्रतिनिधी)
लहान राख्यांमुळे पोस्टाला दिलासा
मोठ्या आकाराच्या राख्या पोस्टाने पाठविल्यानंतर त्या नियोजित स्थळी, पाठविल्या त्याच स्थितीत जाणार का हा प्रश्न होता. कारण, त्या राख्या लिफाफ्यामध्ये मावेनाशा होत. त्यामुळे, लिफाफ्यावर शिक्का मारण्याला पोस्टमनला अडचण जाई आणि, पोस्टाच्या प्रवासात इप्सित स्थळी जाईपर्यंत लिफाफा फुटून जात असे. आताच्या लहान राख्यामुळे या अडचणी दूर झाल्या आहेत. हे उल्लेखनीय !

Web Title: Rakhi also changed the trends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.