राजुरा क्षेत्रात होणार बलाढ्य लढत
By Admin | Updated: October 11, 2014 23:02 IST2014-10-11T23:02:42+5:302014-10-11T23:02:42+5:30
राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये बलाढ्य लढत होण्याचे संकेत आहेत. एकंदर राजुरा विधानसभा क्षेत्र एका बलाढ्य लढतीकडे

राजुरा क्षेत्रात होणार बलाढ्य लढत
बी.यू.बोर्डेवार - राजुरा
राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये बलाढ्य लढत होण्याचे संकेत आहेत. एकंदर राजुरा विधानसभा क्षेत्र एका बलाढ्य लढतीकडे वाटचाल करताना दिसत आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रात १९६२ नंतर तब्बल ५२ वर्षांनी काँग्रेसचे सुभाष धोटे आणि भारतीय जनता पक्षाचे अॅड. संजय धोटे हे आमने- सामने आले आहेत. १९६२ च्या राजुरा विधानसभेच्या निवडणुकीत या क्षेत्रात तुल्यबळ लढत झाली. काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांचे काका विठ्ठलराव धोटे यांना २२ हजार ८१८ मते मिळाली, तर भाजपाचे उमेदवार अॅड.संजय धोटे यांचे वडील यादवराव धोटे यांना २२ हजार ७४५ मते मिळाली होतीे. १९६२ च्या निवडणुकीत विठ्ठलराव धोटे केवळ ७३ मतांनी विजयी झाले होते.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील १९६२ पासून झालेल्या ११ लढतीमध्ये सहावेळा काँग्रेसने बाजी मारली तर दोन वेळा जनता दल, दोन वेळा शेतकरी संघटना तर एक वेळा अपक्ष उमेदवार निवडून आला. १९६७ मध्ये अपक्ष उमेदवार श्रीहरी जीवतोडे यांनी काँग्रेसचे उमेदवार अॅड. विठ्ठलराव धोटे यांना तीन हजार ९१४ मतांनी पराभूत केले होते.
राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये मागील ५२ वर्षांत अनेक बलाढ्य लढती झाल्या. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रभाकरराव मामुलकर यांनी भाजपाचे प्रभाकरराव धोटे यांना १४ हजार २३४ मतांनी पराभूत केले होते. प्रभाकरराव मामूलकर यांना ३६ हजार २३५ मते मिळाली, तर भाजपाचे प्रभाकरराव धोटे यांना २२ हजार १ मते प्राप्त झाली होती. १९९९ मध्ये प्रथमच या क्षेत्राचे शेतकरी संघटनेचे उमेदवार अॅड.वामनराव चटप यांना काँग्रेसचे सुदर्शन निमकर यांनी सात हजार ४८३ मतांनी पराभूत केले. सुदर्शन निमकर यांना ५० हजार ६५४ मते मिळाली, तर शेतकरी संघटनेचे अॅड. वामनराव चटप यांना ४३ हजार १७१ मते मिळाली होती. २००९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी शेतकरी संघटनेकडून उभे असलेले अॅड. संजय धोटे यांना १६ हजार ८७ मतांनी पराभूत केले होते. मधल्या काळात येथील राजकारणात बरीच उलथापालथ झाली. शेतकरी संघटनेचे अॅड. संजय धोटे भाजपात गेले. शेतकरी संघटनेचे अॅड. वामनराव चटप आम आदमी पार्टीत जाऊन पुनन्हा स्वगृही परतले. माजी आमदार सुदर्शन निमकर काँग्रेस सोडून राष्ट्रवादी गेले.
सध्याच्या राजकारणात साम-दाम- दंड भेद या आयुधांचा सडेतोड वापर होत आहे.
या निवडणुकीत राजुरा विधानसभेसाठी १६ उमेदवार रिंगणात असून काँग्रेसचे सुभाष धोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, सुदर्शन निमकर, भाजपाचे उमेदवार अॅड. संजय धोटे यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहेत. आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडियाचे उमेदवार उद्धव नारनवरे, राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पार्टीचे उमेदवार प्रवीण निमगडे, अखिल हिंद फारवर्ड ब्लॉकचे उमेदवार शोभा मस्के, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे उमेदवार सुधाकर किन्नाके, अपक्ष उमेदवार अरुण वासलवार, विद्यासागर कासर्लावार, सटवा थोरात, प्रेमदास मेश्राम, मदन बोरकर असे १६ उमेदवार आपले नशिब आजमावित आहेत.