आधी निधी उभारा; नंतर योजना सुरू करा
By Admin | Updated: July 6, 2017 00:43 IST2017-07-06T00:43:06+5:302017-07-06T00:43:06+5:30
नागरिकांना मुबलक पाणी देणारी महत्त्वाकांक्षी अमृत योजना महापालिकेने हाती घेतली आहे.

आधी निधी उभारा; नंतर योजना सुरू करा
जलबिरादरीचे आमदारांना निवेदन : अमृत योजनेसाठी तज्ज्ञांच्या समितीची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागरिकांना मुबलक पाणी देणारी महत्त्वाकांक्षी अमृत योजना महापालिकेने हाती घेतली आहे. मात्र या योजनेसाठी मनपाला ६५ ते ७० कोटींचा निधी उभारावा लागणार आहे. मनपाचे उत्पन्न लक्षात घेता एवढा मोठा निधी योजनेच्या कालावधीत उभारणे कठीण आहे. निधीअभावी योजनेची वाट लागण्याची शक्यता असल्याने मनपाने आधी निधी उभारावा, नंतरच योजनेची सुरूवात करावी. सोबतच या योजनेसाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करावी, या मागणीचे निवेदन आमदार नाना श्यामकुळे यांना दिल्याची माहिती जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महानगरपालिकेद्वारे केंद्र व राज्य शासनाकडे ‘अमृत’ पाणी पुरवठा योजनेचा जो प्रस्ताव पाठविला आहे, त्यामध्ये शहराच्या तीन लाखांवर असलेल्या लोकसंख्येला दरडोई १३५ लिटर पाणी दररोज उपलब्ध होणार आहे. योजनेचा पहिला टप्पा २३१ कोटी रुपये अंदाजपत्रकाचा आहे. या योजनेत केंद्र शासनाचा ५० टक्के, राज्य शासनाचे २५ टक्के व मनपाचे २५ टक्के म्हणजे ५७ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्याच्या कामासाठी लागणार आहे. या व्यतिरिक्त सदर प्रस्ताव शासनाकडे सादर करताना अंदाजपत्रकाचे दर हे जुने देण्यात आल्यामुळे निविदेचा जो जादा दर आला, त्याच्या फरकाची रक्कम ही सुमारे सहा ते आठ कोटी असणार आहे व हा बोझा मनपालासहन करावा लागणार आहे. याशिवाय सुमारे ५० हजार नळधारकांना मीटर लावण्यासाठी प्रति मीटर २२०० रुपये प्रमाणे ११ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. एकंदरीत अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करताना महानगरपालिकेला ६५ ते ७० कोटींचा निधी उभा करावा लागेल. हा निधी मनपा कसा उभारेल, असा प्रश्नही त्यांनी निवेदनात केला आहे.
१९९८ ची पुनरावृत्ती होऊ नये
१९९८ मध्ये अशीच वाढीव पाणी पुरवठा योजना मनपाने हाती घेतली होती. ३८ कोटींची ही योजना होती. या योजनेसाठी साहित्यही खरेदी केले होते. मात्र ही योजना आजतागयत पूर्ण होऊ शकली नाही. कोट्यवधींच्या भूमिगत मल:निस्सारण योजनेचीही तसेच झाले. त्यामुळे अमृत योजनेसाठी शहरातील अनुभवी व तज्ज्ञ नागरिकांची समिती स्थापन करावी, अशी मागणीही संजय वैद्य यांनी आमदारांकडे केली आहे.