पावसाळा तोंडावर; संसार उघड्यावर
By Admin | Updated: June 13, 2014 00:00 IST2014-06-13T00:00:06+5:302014-06-13T00:00:06+5:30
चौदा दिवस लोटून गेले. परंतु अद्यापही गडचांदूर येथील आगग्रस्तांना निवाऱ्यासाठी छत मिळालेले नाही. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असून दुसरीकडे पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. अशाच जळालेल्या राखेवर मोडलेली

पावसाळा तोंडावर; संसार उघड्यावर
रत्नाकर चटप - लखमापूर
चौदा दिवस लोटून गेले. परंतु अद्यापही गडचांदूर येथील आगग्रस्तांना निवाऱ्यासाठी छत मिळालेले नाही. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असून दुसरीकडे पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. अशाच जळालेल्या राखेवर मोडलेली खाट किंवा प्लॉस्टिकची फाडी अंथरुन दिवस काढावे लागत आहे.
काहीच शिल्लक न राहिल्याने अंगावर झाकायला कपडे, खायला अन्न आणि आर्थिक पैशाची चणचण मोठ्या प्रमाणात भासत आहे. अचानक दु:ख पदरी पडल्याने महिला व पुरुष अद्यापही दुखातून सावरल्या नसल्याचे दिसत आहे. शेजारी व नातेवाईकाकडून एखादी खाट किंवा प्लॉस्टिक फाडी मागून झाडाच्या सावलीत बसून दिवस काढणे आणि रात्री आपल्या जागेवर मातीवर झोप घेणे अशी दु:खी दिनक्रम या आगग्रस्त कुटुंबियांचा सध्या आहे. घरात भांडी नसल्याने साधा चहाही बनवून पिता येत नसल्याचे नागरिक सांगतात. प्रशासनाने करोडोचे नुकसान दाखविले. परंतु मदत पाहिजे त्या प्रमाणात अद्यापही झालेली नाही. आगीत अंगावरच्या कपड्यासह अंथरुणाचे सर्व साहित्य जळाले. त्यामुळे पांघरायलासुद्धा गोधडी नाही. तप्त उन्हात दिवस काढावे लागत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. लहान मुलांवर याचा मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. पुन्हा घर उभे करण्यासाठी आर्थिक पुंजी कशी गोळा करावी. आगीत घर उद्ध्वस्त झाल्याने गेल्या १४ दिवसांपासून महिला पुरुष कामावर गेलेले नाही. आज ना उद्या शासनाची मदत पदरी पडेल या आशेत येथील नागरिक दिवस घालवत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने कधी पाऊस पडेल याचा अंदाज सांगता येणार नाही. त्यामुळे राहण्यापुरते किमान टिनाचे पत्रे, सिमेंट खांब आणि ताटवे देऊन घर उभारण्यासाठी मदत शासनाने करावी, अशी मागणी या आगग्रस्तांनी केली आहे. पावसाळ्यात हाताला काम मिळत नाही. यातच घराची सर्वत्र पडझड झाल्याने घरं उभी करण्यास बराच वेळ जाईल. त्यामुळे आतापर्यंत मदत मिळणे अपेक्षित होते. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.