ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूरमध्ये पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:00 AM2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:32+5:30

ब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अद्यापही धोका टळलेला नाही.

Rainfall hail in Brahmapuri, Nagbhid, Chimur | ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूरमध्ये पावसाचा कहर

ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूरमध्ये पावसाचा कहर

googlenewsNext
ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : ब्रह्मपुरीत हाहाकार, एक जण वाहून गेला, शेकडो घरांत पाणी घुसले, शेतीचेही मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर तालुक्यात पावसाने कहर केला असून ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पहाटे ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने ४ ते ५ तास हजेरी लावली. यामुळे संपूर्ण तालुका पाण्याखाली आला आहे. सुंदरनगर, हनुमाननगर, भवानी वार्ड, कुर्झा प्रभागात जवळपास १०० घरांचे तसेच ग्रामीण भागात १२५ घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. तालुक्यातील बेटाळा येथील लक्ष्मीबाई सौंदरकर या महिलेच्या अंगावर भिंत पडून ती गंभीर जखमी झाली आहे. तर बोढेगाव येथील पुंडलिक रामाजी गाढे (६५) हे पाण्यात पाहून गेल्याची माहिती मिळाली असून प्रशासनाने शोधकार्य सुरु केले आहे. नागभीड नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या बाम्हणीला पुराच्या पाण्याने पुन्हा वेढले असून ३५० घरांची लोकवस्ती असलेले संपूर्ण गावच बाधित झाले आहे. नागभीड - बाम्हणी नाला ओसंडून वाहू लागल्याने काही वेळासाठी नागपूर - नागभीड मार्ग बंद करण्यात आला होता. तर चिमूर तालुक्यातील खैरी व पांजरेपार गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक घरांत पाणी शिरले असून रस्ते पूर्णत: जलमय झाले आहेत.

अघोषित संचारबंदी
ब्रह्मपुरी शहरात सकाळपासून मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे कुणीही घराबाहेर निघला नाही. परिणामी शहरात अघोषित संचारबंदीचे दृश्य आज बघायला मिळाले. शाळा, महाविद्यालय शिक्षक, विद्यार्थी जाऊ शकले नाही. सकाळी ९ नंतर काही प्रमाणात नागरिक रस्त्यावर दिसले.

बारई तलाव फुटण्याच्या मार्गावर
ब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अद्यापही धोका टळलेला नाही. सदर तलाव खासगी मालकीचा असल्याने प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. तलावाची मालकी असल्याचे सांगणारेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेकडो घरांना याचा परिणाम भोगावा लागत आहे. शांतीनगरातील शतायू रुग्णालयात उपचारासाठी जाणाºया रुग्णांना ३ ते ४ फूट पाण्यातून मार्ग काढत जावे लागले. यामुळे रुग्णांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

तालुक्यातील शेतकरी संकटात
चिमूर तालुक्यात मागील चार दिवसांपासून पावसाच्या दुसºया इनींगमुळे तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन पीक पाण्याखाली आल्याने हा हंगाम शेतकऱ्यांना नुकसान दायक ठरणार असून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सावधगिरीचा इशारा
शहरातील बारई तलावाची धोकादायक स्थिती लक्षात घेता तलावाच्या खालील भागात राहणाºया शेषनगर परिसरातील नागरिकांना ध्वनिक्षेपकाच्या सहाय्याने प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला असून वेळप्रसंगी सदर भागातील नागरिकांना इतरत्र हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पाचे ११ दरवाजे दीड मीटरने व २२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन मदत करण्याचे आदेश दिले.

Web Title: Rainfall hail in Brahmapuri, Nagbhid, Chimur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.