रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर
By Admin | Updated: April 8, 2015 00:07 IST2015-04-08T00:07:09+5:302015-04-08T00:07:09+5:30
चिमूर तालुका दुष्काळग्रस्त असताना सुद्धा रबी पीक घेणारे १०४ गावे मदतीपासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे....

रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर
मदत देताना भेदभाव : १०४ गावांतील शेतकरी मदतीपासून वंचित
चिमूर : चिमूर तालुका दुष्काळग्रस्त असताना सुद्धा रबी पीक घेणारे १०४ गावे मदतीपासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
चिमूर तालुक्यात २५९ गावे असून १५५ गावे खरीप हंगामातील आहे तर १०४ गावे रबी हंगामात आहे. सन २०१४ या वर्षात दुष्काळग्रस्त गावांची यादी बनविताना केवळ खरीप गावांनाच मदत देण्याचा प्रकार चिमूर तालुक्यात घडला आहे.
१५५ गावांतील २३ हजार ७७५ शेतकरी खरीप हंगामात बाधित दाखविण्यात आले आहेत. त्यांना मदतीपोटी १० कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. मात्र शासनाने ही मदत देताना खरीप व रबी असा भेदभाव करीत सर्व शेतकऱ्यांना मदत दिली नाही. १०४ गावांत रबीचे पिके घेतली जातात. त्यात गहू, चणा, लाख, लाखोळी, जवस, मूग आदी पिके घेतली जातात. याची सातबाऱ्यावर नोंदसुद्धा आहे. यावरच पीक कर्जसुद्धा घेतल्या जाते. खरीप व रबी गावांची वेगवेगळी माहिती शासनाकडे महसूल विभाग सादर करतो. खरिपाची आणेवारी १५ जानेवारी व रब्बीची आणेवारी १५ मार्चपर्यंत सादर केल्या जातो. दोन्ही आणेवाऱ्या ५० टक्के रकमेचे आत असून देखील १०४ गावातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित आहे. त्यात प्रामुख्याने शंकरपूर, कोलारी, साठगाव, येरखडा, कन्हाळगाव, महालगाव, सोनेगाव, खापरी, भिवकुंड, परसोडी, शिवापूर, आतगाव, मूरपार, बोथली आदी गावाचा समावेश होतो.
रबी हंगामाची आणेवारी ४४ टक्के आहे. त्यामुळे रबी दुष्काळ घोषित करून मदत करावी व लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
शेतकरी हतबल
यंदा निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. सुरूवातील बेपत्ता झालेला पाऊस नंतरच्या काळात अधुनमधून बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडून गेले. त्यात आता सरकारकडूनही शेतकऱ्यांनी हेटाळणी केली जात आहे.