दुकानांसमोर पुन्हा दुचाकीच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:24+5:30
जिल्ह्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत उघडी ठेवण्यास परवानगी आहे. मात्र दुकानामध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दुकानदारांनी दुकानामध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घेवू नये, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन या अटी असताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. दरम्यान, मागील आठवड्यापासून जिल्हा प्रशासनाने यात शिथिलता दिली आहे. तेव्हापासून दुकाने गजबजली असून दुकानांसमोर दुचाकींच्या रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी तसेच येणाऱ्या ग्राहकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत उघडी ठेवण्यास परवानगी आहे. मात्र दुकानामध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दुकानदारांनी दुकानामध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घेवू नये, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन या अटी असताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू आहे. परंतु रात्री १० वाजेपर्यंत अनेक नागरिक रस्त्याने फिरताना दिसून येतात. त्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील दुकानांसमोर ग्राहकांना उभे राहण्यासाठी ठराविक अंतरावर जागा आखणे आवश्यक आहे. मात्र त्याच ठिकाणी ग्राहकांची वाहने बघायला मिळत आहे.
उल्लंघन केल्यास होणार कारवाई
वैद्यकीय कारणाशिवाय किंवा मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून इतर व्यक्तींना आंतर जिल्हा व आंतर राज्य संचार करण्यास बंदी आहे. अधिकृत परवानगी शिवाय परराज्यातून जिल्ह्यात व जिल्ह्यातून परराज्यातून प्रवासाच्या वाहतुकीस पूर्णपणे बंदी आहे. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद, सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार व तत्सम, व्यायामशाळा व सामुहिक खेळांसाठी क्रीडा कॉम्पलेक्स बंद ठेवण्याचे आदेश आहेत. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी आहे. सर्व धार्मिक स्थळे अथवा पूजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई होऊ शकते.