चिमूर तालुक्यात एटीएमद्वारे मिळणार शुद्ध पाणी
By Admin | Updated: April 11, 2016 01:02 IST2016-04-11T01:02:36+5:302016-04-11T01:02:36+5:30
देशात विज्ञानाच्या प्रगतीने व मानवाचा वेळ वाचावा, यासाठी नागरिकांना एटीएम मशीनमधून पैसे काढता येतात.

चिमूर तालुक्यात एटीएमद्वारे मिळणार शुद्ध पाणी
भांगडियांचा उपक्रम : सहा गावात लागणार एटीएम सयंत्र
चिमूर : देशात विज्ञानाच्या प्रगतीने व मानवाचा वेळ वाचावा, यासाठी नागरिकांना एटीएम मशीनमधून पैसे काढता येतात. ही एटीएम मशीन आता पैसे काढण्यासाठीच सीमित न राहता शुद्ध पाणीही देणार आहे.
जल जीवन आहे मनवाच्या सुदृढ आरोग्यासाठी शुद्ध पाणी गरजेचे आहे. दूषित पाण्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येते. यासाठी शासन नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे गावात नळयोजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो. तरीही अनेक भागात नळाचे पाणी मोठ्या प्रमाणात पोहचत नाही. यासाठी नेहमीच नागरिकांची ओरड असते.
नागरिकांची ही ओरड लक्षात घेऊन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी चिमूर शहरात एटीएमद्वारे पाणी पुरवठा करण्याचा उपक्रम जिल्ह्यात सर्वप्रथम सुरू केला. आजघडीला चिमूर शहरातील वडाळा येथे हे संयत्र नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करीत आहे.
हा प्रयोग आमदार भांगडिया यांनी स्वखर्चातून केला होता. एटीएमद्वारे पाणी देण्याचा हा प्रयोग चिमुरातील वडाळा प्रभागात यशस्वी झाल्याने इतर गावातही शुद्ध पाणी पुरवठाची एटीएम योजना पोहोचवावी म्हणून त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सहा गावांत ही योजना मंजूर केली आहे.
चिमूर तालुक्यातील अनेक गावांत फ्लोराईडयुक्त पाण्याचा पुरवठा आजही होत आहे. त्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र नागरिकांना भेडसावणाऱ्या या पाण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळावी याकरीता तालुक्यातील खडसंगी, मोटेगाव, तळोधी (बा), मासळ, जांभुळघाट व आंबोली या गावात शुद्ध पाण्याच्या एटीएम मशीन लागणार आहेत.
यासाठी विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया यांच्या स्थानिक विकास निधीतून ३५ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर करम्यात आला आहे. त्यामुळे या सहा गावातील नागरिकांना एटीएमद्वारे शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे.
गावातील पाण्याच्या स्त्रोतातून पाणी एटीएम मशीनमध्ये घेवून त्यामध्ये शुद्ध करण्यात येणार आहे. गावातील इच्छुक नागरिकांना काही ठराविक मासिक शुल्क आकारून एटीएम कार्ड देण्यात येणार आहे. कार्ड टाकताच प्रत्येक नागरिकाला २० ते ३० लिटर पाणी मशीनमधून मिळणार आहे. हे कार्ड दुसऱ्यांदा वापरता येणार नाही. या सयंत्राच्या देखभालीसाठी काही शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे टंचाईत दिलासा मिळणार आहे. (लोकमत चमूू)