: प्रशासकीय बैठकीत निर्णय
चिमूर :
सरकारने कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी विकेंड लॉकडाऊनसह राज्यात नवीन मार्गदर्शक सूचनानुसार कडक निर्बंध बुधवारपासून जारी केले आहेत. मात्र चिमूर तालुक्यात कोरोनाने तांडव घातला आहे. अनेक नागरिक कोरोनाचे बळी पडत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी व्यापारी, सामाजिक संघटना, पत्रकार संघटना आदीची तातडीची बैठक घेतली. बैठकीत सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार अत्यावश्यक सेवा वगळता १५ एप्रिल ते १ मेपर्यत जनता कर्फ्यू व कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तालुक्यातील शंकरपूर, भिसी, जांभूळघाट, मासळ, खडसंगी, नेरी, चिमूरसह ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आतापर्यत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी अंदाजे पाचशेच्यावर टप्पा गाठला आहे. अनेक नागरिक कोरोनाचे बळी पडत आहे तर अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. ७ ते १४ एप्रीलपर्यत सात दिवसात नागरिकांच्या मृत्यूने शंभरी गाठली आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी तालुक्यात ब्रेक द चैन अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी, सामाजिक संघटना, पत्रकार आदीची तातडीची बैठक घेतली. यात १५ एप्रील ते १ मेपर्यत जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. अंमलबजावणीसाठी दहा जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. शहरात मार्केटमध्ये कोणीही भाजीपाला घेऊन रस्त्यावर बसणार नाही. मात्र फेरीवाल्यांना प्रभागात गाडीने भाजीपाला विकण्यास परवानगी दिली आहे.