२१ मोलकरणींच्या रोटीची सोय; सात हजार जणींचे पोट कसे भरणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:59+5:302021-04-18T04:26:59+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात घरभांडी, कपडे धुणे, फरशी साफसफाई, स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यापैकी सन २०२० मध्ये ...

२१ मोलकरणींच्या रोटीची सोय; सात हजार जणींचे पोट कसे भरणार!
चंद्रपूर जिल्ह्यात घरभांडी, कपडे धुणे, फरशी साफसफाई, स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यापैकी सन २०२० मध्ये केवळ सात हजार ३५७ घरकाम करणाऱ्यांची नोंदणी केली आहे. दरवर्षी नोंदणीचे नूतनीकरण करणे गरजेचे असते; मात्र याकडे घरकाम करणाऱ्या महिलांचे दुर्लक्ष झाले आहे. केवळ २१ महिलांनी नोंदणीचे नूतनीकरण केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने संचारबंदी सुरू केली आहे. घराबाहेर निघण्यास निर्बंध घातले आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांचे काम बंद झाल्याने त्यांना अडचण निर्माण झाली आहे. अशांना मदत करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने नोंदणीकृत महिलांना दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत सात हजार ३५७ महिलांपैकी केवळ २१ महिलांनी यंदा नूतनीकरण केल्याने त्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या महिलांचा रोजीरोटीचा प्रश्न मिटला; परंतु उर्वरित महिलांचे काय, असा प्रश्न कामगार संघटनांकडून होत आहे.
बॉक्स
अनेक मोलकरणींची नोंदच नाही
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडे घर कामगार महिलांची नोंद केली जाते. त्यांच्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात; परंतु या अनुषंगाने प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे अनेक महिला घरकाम करूनही त्याची नोंद सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडे करीत नाहीत. नोंदणीच्या या घोळामुळेच या घरकामगार महिला मदतीपासून वंचित राहत आहेत.
बॉक्स
नूतनीकरण केलेल्या घरकामगारांनाच मदत
चंद्रपूर येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडे सात हजार ३५७ घर कामगार महिलांची नोंद आहे. या घरकामगार महिलांनी दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे; मात्र यंदा केवळ २१ जणांनीच नूतनीकरण केले आहे. त्यामुळे त्यांनाच ही मदत मिळणार आहे. परिणामी, अनेक महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत.
कोट
जिल्ह्यात सात हजार ३५७ कामगार महिलांची नोंद आहे; परंतु त्यापैकी केवळ २१ जणांनीच नूतनीकरण केले आहे. त्यामुळे त्यांनाच मदत मिळणार आहे. घरकाम करणाऱ्या महिलांनी, तसेच कामगारांनी संचारबंदी हटल्यानंतर कामगार कार्यालयात येऊन ऑनलाइन नूतनीकरण करावे.
-नितीन पाटणकर, सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर
------
कोट
शासनाने संचारबंदीच्या काळात मदत देण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे; परंतु ही मदत कुठल्याही अटी व शर्ती न लावता, त्वरित द्यावी, हाताला काम नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. -द्वारकाबाई गेडाम.
-----
बऱ्याच वर्षांपासून धुणी-भांडी घासण्याचे काम करीत आहे. त्याचीपण नोंदणी करायची असते. याबाबत कुठलीही माहिती नाही. त्यामुळे आता शासनाने सरसकट मदत करावी. लॉकडाऊन संपल्यानंतर नोंदणी करू.
-पर्वता राऊत.