अतिउष्णतामानातही शेतकर्याने घेतले मक्याचे उत्पादन
By Admin | Updated: May 15, 2014 23:25 IST2014-05-15T23:25:18+5:302014-05-15T23:25:18+5:30
महिन्यातील कडक उन्हाळा व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असतानाही एका शेतकर्याने धाडस करून भरघोस मक्याचे उत्पादन घेतले. त्यातून हजारो रुपयांची आर्थिक प्राप्ती करून अन्य शेतकर्यांसमोर...

अतिउष्णतामानातही शेतकर्याने घेतले मक्याचे उत्पादन
प्रवीण खिरटकर - वरोरा मे महिन्यातील कडक उन्हाळा व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असतानाही एका शेतकर्याने धाडस करून भरघोस मक्याचे उत्पादन घेतले. त्यातून हजारो रुपयांची आर्थिक प्राप्ती करून अन्य शेतकर्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. चंद्रपूर परिसरात उष्णतामान अधिक असल्याने उन्हाळ्यामध्ये अनेक पिकांचे उत्पादन ओलीत करून येत नाही. त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात पीक घेण्याची हिंमत शेतकरी करीत नाहीत. असे असताना विसापूर (मासळ) या गावातील शेतकरी देविदास नारायण टोंगे यांनी भरघोस मक्याचे उत्पादन घेतले आहे. देविदास टोंगे या शेतकर्याकडे नऊ एकर शेती आहे. त्यातील पाच एकर शेती ओलिताखाली आणली. ओलिताच्या शेतीत टोंगे हे वर्षभर भाजीपाल्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेत असतात. भाजीपाला ठोक भावाने न विकता त्याची आठवडी बाजारात बसून विक्री केल्यास फायदा होत असल्याचा अनुभव देविदास टोंगे यांच्या पाठीशी आहे. त्यांनी यावर्षी प्रथमच आपल्या शेतातील पाऊण एकरात मक्याचे बियाणे लावले. जानेवारी महिन्यात बियाणे लावले. पाऊण एकरात एक हजार ९00 रुपयांची बिजाई नागपूर येथून आणण्यात आली. तीन बाय तीन या सार्यात बियाणे लावले. दोन हजार रुपयांचे खत देण्यात आले. दोन हजार रुपयांची एक फवारणी, निंदन खर्च एक हजार असा सात हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. अधिक उष्णतामानामुळे मक्याचे पीक हाती येणार नसल्याचे अनेक तज्ज्ञांनी देविदास टोंगे यांना सांगितले. परंतु देविदास टोंगे यांनी धाडस केले. मक्याचे पीक येणार की नाही याची शंका असल्याने त्यांनी ढेमसाचे आंतरपीक घेतले. सहा ते सात हजार रुपये ढेमसाच्या पिकातून मिळाल्याने मका लागवडीचा खर्च निघाला. त्यामुळे देविदास टोंगे निश्चिंत होते. सध्या मक्याची बारा हजार झाडे असून तीन महिन्यात मक्याचे पीक हाती येवू लागले. आतापावेतो सात ते आठ तोडे झाले आहेत. यानंतरही एवढेच तोडे निघणार असून मका चवदार असल्याने बाजारात त्याची मोठी मागणी आहे. प्रत्येक तोड्यात एक ते दीड हजार मका विकावयास नेत असतात. पुढील वर्षी मक्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कष्टाला प्रामाणिक प्रयत्नांची जोड दिली की, यश आपसूकच पायाशी येतं, हेच या शेतकर्याने दाखवून दिले.