डेंग्यूसदृश ताप नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
By Admin | Updated: May 19, 2014 23:26 IST2014-05-19T23:26:19+5:302014-05-19T23:26:19+5:30
जिल्ह्यातील अनेक गावांत डेंग्यू सदृश्य तापाची लागण झाली असून या सर्व गावांत आरोग्य यंत्रणेमार्फत ताप सर्वेक्षण, डासोत्पत्ती स्थाने सर्वेक्षण, किटकजन्य आजार

डेंग्यूसदृश ताप नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत डेंग्यू सदृश्य तापाची लागण झाली असून या सर्व गावांत आरोग्य यंत्रणेमार्फत ताप सर्वेक्षण, डासोत्पत्ती स्थाने सर्वेक्षण, किटकजन्य आजार विषयक माहिती आरोग्य कर्मचार्यामार्फत दररोज देणे सुरू आहे. जिल्ह्यातील चारगाव, फुरडीहेटी, राळापेठ, तारासाखुर्द, धानापूर, पाचगाव, बोर्डा झुल्लुरवार, पोंभूर्णा, चिंतलधाबा, मानोरा व वरवट या बाराही गावात डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळून आल्यामुळे या गावात आरोग्य शिबिरे घेऊन गावातील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात आली व ताप आलेल्या रुग्णांची हिवताप व डेंग्यूसाठी रक्त नमुना तपासणी करण्यात आली. दूषित रक्त आढळून आलेल्या रुग्णांवर वैद्यकीय अधिकार्यामार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. काही गावांमध्ये डेंग्यू तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्राम पंचायत सरपंच, सर्व तालुक्याचे संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसेवकांना संबंधित गावातील ग्राम स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे नियमित निर्जंतुकीकरण, नाली वाहती करणे, गटारे साफ करणे, व्हेंट पाईपला जाळी बांधणे, धूर फवारणी व इतर सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सुचीत करण्यात आलेले होते. त्यानुसार संबंधित गावात उपाययोजना सुरू आहेत. जिल्हास्तरावरुन साथरोग नियंत्रण टिम साथ रोग उद्रेक गावात तसेच त्याचे आजुबाजुच्या गावात वरीलप्रकारे उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या साथरोग उद्रेक परिस्थिती नियंत्रणात असून कोणत्याही खोट्या माहितीला न घाबरता आपले घर, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावी, मच्छरदाणीचा वापर करावा. पूर्ण शरीर झाकलेले कपडे परिधान करावे, पाणी साठवणीची भांडी साफ करून कोरडा दिवस पाळावा रांजन, पाणी साठवणींची भांडी झाकून ठेवावी, जेनेकरून डासअळी निर्माण होणार नाही, अशाप्रकारच्या उपाययोजना करून आपले आरोग्य व आपले गाव निरोगी ठेवण्याबाबत आशुतोष सलील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे. (प्रतिनिधी)