विद्युत खांब अद्यापही महामार्गावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST2020-12-11T04:56:29+5:302020-12-11T04:56:29+5:30
नागभीड : नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन आता दीड वर्षाचे वर कालावधी होत असला तरी विद्युत पोल ...

विद्युत खांब अद्यापही महामार्गावरच
नागभीड : नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन आता दीड वर्षाचे वर कालावधी होत असला तरी विद्युत पोल मात्र अद्याप महामार्गावरच आहेत. पोल रस्त्यावरच असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उल्लेखनीय बाब ही की, येथील जुना बसस्थानक ते टी पाईंट चौक या वर्दळीच्या ठिकाणीच हे विद्युत खांब उभे आहेत.
नागभीड-आरमोरी हा पूर्वी राज्य महामार्ग होता. हा राज्यमार्ग रूंदीने लहान होता. विद्युत वितरण कंपनीनेही राज्य महामार्गाच्या नियमानुसार अंतर राखून विद्युत पोल लावले होते. मात्र आता या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गाची रूंदी वाढल्यामुळे हे विद्युत खांब आता रस्त्यावर आले आहेत.
उमरेड आरमोरी या राष्ट्रीय महामार्गातील नागभीड आरमोरी या टप्प्याचे काम दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्यानंतर हे पोल हटविण्यात येतील अशी नागरिकांची अपेक्षा होती.मात्र हे पोल आताही तसेच आहेत. विशेष म्हणजे नागभीड नगर परिषदेतच समाविष्ट असलेल्या सुलेझरीपासून समोर ब्रम्हपुरीकडे जाणाऱ्या याच राष्ट्रीय महामार्गावरील विद्युत खांब हटवून ते सुरक्षित अंतरावर लावण्यात आले आहेत. मात्र ऐन वर्दळीच्या असलेल्या येथील जुना बसस्थानक ते टी पाईंट चौकापर्यंत जे खांब लावण्यात आले आहे ते अद्यापही ''''''''जेसे थे'''''''' आहेत.
दरम्यान यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता संबंधित विभागाने या महामार्गाचा अंदाजपत्रक बनवतेवेळी जुना बसस्थानक ते टी पाईंटचौकपर्यंतच्या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याच्या बाबीचा उल्लेख अंदाजपत्रकात केला नव्हता अशी माहिती दिली. बाकी सर्व रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.
रस्त्यावरील विद्युत खांबांमुळे एखादेवेळेस अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने आता या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणारी कंपनीने येथून गाशा गुंडाळला असला तरी या रस्त्याचे देखभाल करण्यासाठी एक युनिट नेहमीच सक्रिय आहे. येथील नगर परिषदेने संभाव्य धोका टाळण्यासाठी हे विद्युत खांब हटविण्यासंदर्भात पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे.