रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब
By Admin | Updated: June 24, 2015 01:33 IST2015-06-24T01:33:20+5:302015-06-24T01:33:20+5:30
शहरातील डॉ.आंबेडकर महाविद्यालय ते आकाशवाणी मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आले खरे, परंतु ...

रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब
चंद्रपूर: शहरातील डॉ.आंबेडकर महाविद्यालय ते आकाशवाणी मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आले खरे, परंतु सिमेंटीकरण करण्यापूर्वी या रस्त्याच्या मधोमध असलेले खांब हटविण्याची गरज वीज वितरण कंपनीला वाटली नाही. परिणामी हे खांब अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी आकाशवाणी लगत रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबावर दुचाकी जाऊन आदळली त्यात वडिल व मुलगी असे दोघेही गंभीर जखमी झालेत.
मुळात यासाठी वीज वितरण कंपनीच जबाबदार असल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. वीज वितरण कंपनीने वीज तारा ओढण्यासाठी वाट्टेल तेथे खांब उभे केले आहेत. सार्वजनिक रस्त्यावर खांब उभे करण्यापूर्वी वीज वितरणने कोणताही विचार केला नाही. अलीकडे महानगर पालिकेच्यावतीने रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी रस्त्यावर असलेले खांब हटविण्याची विनंतीही वीज वितरण कंपनीकडे करण्यात आली. मात्र वीज वितरणने खांब हटविले नाहीत. ही प्रक्रीया अतिशय धिम्या गतीची असल्याने खांब हटण्याची प्रतीक्षा करून करून थकलेल्या कंत्राटदाराने आपले काम पूर्ण केले. आता रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी आकाशवाणी परिसरातील रहिवासी रमण लोखंडे व त्यांची मुलगी असे दोघे रात्रीच्या सुमारास दुचाकीने घराकडे जात होते. दरम्यान, आकाशवाणीच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिरासमोर रस्त्याच्या मधोमध असलेल्या वीज खांबावर त्यांची मोटारसायकल आदळली. त्यात दोघेही गंभीर जखमी झालेत. या ठिकाणी नेहमीच अपघात घडत असून हे खांब हटविण्याची मागणी केशव आवारी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)