वीज कंपनीच्या कारभाराने ग्राहक त्रस्त
By Admin | Updated: September 1, 2015 00:51 IST2015-09-01T00:51:53+5:302015-09-01T00:51:53+5:30
गडचांदूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.

वीज कंपनीच्या कारभाराने ग्राहक त्रस्त
भाजपाच्यावतीने अभियंत्याला निवेदन : बंद असलेल्या मीटरचे बिल देण्याचा प्रकार
गडचांदूर: गडचांदूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. ग्राहकाचा त्रास त्वरित दूर करण्याची मागणी भाजपाचे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार यांनी एका निवेदनातून कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.
महावितरणतर्फे वीज बिलाची रिडींग घेण्याचे काम कंत्राटी पद्धतीने सुरु आहे. मीटरची रिडिंग दरमहा होत असली तरी घरोघरी जाण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक मिटरचे अंदाजे रिडिंग लिहून बिल पाठविण्याचा प्रकार सुरु आहे. वर्षभरापासून बंद असलेले विद्युत मिटर बंद अवस्थेतच असूनही वीज बिल मात्र नियमित सुरू आहे.
अंदाजे वीज बिलात सरसकट जास्त रिडिंग लावल्यामुळे वीज बिल जास्त येण्याचे प्रकार वाढले आहेत.
यामुळे अनेकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नादुरूस्त मीटर सुरू व्हावे, यासाठी वर्षभरापासून अर्ज करुनसुद्धा नवीन मीटर लावण्यात आले नाही. ग्राहक कार्यालयात चकरा मारुन त्रस्त झाले आहेत. मात्र तक्रारीचे निवारण झाले नाही.
गडचांदूर व परिसरातील शेतकरीसुद्धा त्रस्त आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मीटरचे बिल अंदाजे पाठविण्यात येते. शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त बील येत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र महावितरण बिल कमी करत नाही. उलट, बिल न भरल्यामुळे जोडणी बंद करत आहेत. गडचांदूर येथील वॉर्ड क्रमांक नऊमध्ये आगीत घरे जळालेल्या कुटुंबांना मोठ्या प्रमाणात वीज बिल येत आहे.
महावितरण कार्यालय तक्रार घेऊन जाणाऱ्या ग्राहकाची समस्या जाणून घेण्याऐवजी उलट बोलून ताटकळत उभे ठेवण्यात येते. वीज बिलावर संबंधित मीटरचा फोटो असणे गरजेचे आहे. मात्र अनेक बिलावर फोटोच नसतात. अनेक ग्राहकांना बिल येतच नाही. याविषयी चौकशी केल्यास, मंडळाकडे आपली रक्कम अधिकची आल्याने बिल पाठविले असल्याचे सांगतात. अनेक ग्राहकांना मजुरीचे काम सोडून या कार्यालयात चकरा माराव्या लागतात. कर्मचाऱ्यांना विचारल्यास ‘साहेबांना भेटा’, असे सांगण्यात येते. विद्युत अभियंते कार्यालयात सापडतच नाही. त्यामुळे ग्राहकांना तासनतास वाट बघत बसावे लागते.
उपकार्यकारी अभियंता गडचांदूर यांनी दिलेल्या या निवेदनातून, शहरात वाढीव ८४ पोलचे अंदाजपत्रक तयार करुन मंजुरी देणे, नवीन डीपी त्वरित बसविणे, रात्रीच्या वेळी लाईनमन उपलब्ध देणे आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. शिष्टमंडळात नगरपालिकेचे उपाध्यक्ष सचिन भोयर हरिभाऊ घोरे, धनंजय छाजेड, रामा मोरे, आनंदी मोरे आदींचा समावेश होता. (वार्ताहर)
आरोग्यविषयक मार्गदर्शन
चंद्रपूर: येथील रोटरी क्लबच्यावतीने आरोग्यविषयक स्वच्छता शिबिरांतर्गत स्थानिक पब्लिक स्कूलमध्ये ‘हात धुवा’ प्रकल्प राबविण्यात आला. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष अनुपा भामरी, शर्मिला पोद्दार, बालमुकूंद पालिवार, अजय जयस्वाल, रुपेश वाघाडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. (प्रतिनिधी)