मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

By Admin | Updated: May 12, 2016 01:03 IST2016-05-12T01:03:37+5:302016-05-12T01:03:37+5:30

बीजीपीपीएल उद्योग चंद्रपूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे. उद्योगांना संजीवनी देण्याचे सरकारचे धोरण आहे.

The positive role of chief minister | मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

पुगलिया यांची माहिती : पेपरमिल आंदोलनाची सांगता
बल्लारपूर : बीजीपीपीएल उद्योग चंद्रपूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे. उद्योगांना संजीवनी देण्याचे सरकारचे धोरण आहे. बिल्ट उद्योग कच्चा मालाअभावी बंद पडू देणार नाही. कामगार व व्यापारीवर्गाच्या उपजिविकेसाठी लवकरच उचित निर्णय घेण्याचे व बिल्ट उद्योगाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथील चर्चेदरम्यान सकारात्मक भूमिका घेतली आहे. यामुळे बल्लारपूर येथील मागील १० दिवसांपासून सुरू असलेले उपोषणाचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती बुधवारी माजी खासदार व कामगार नेते नरेश पुगलिया यांनी दिली.
बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने जागतिक कामगार दिनापासून स्थानिक नगरपालिकेत साखळी उपोषण सुरू करण्यात आले. नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात वनमंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्कारण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारला उपोषणावर बसलेले आष्टी येथील पेपर मिल संघटनेचे पदाधिकारी बी.सी. बॅनर्जी, श्रीधर भगत, बी.एम. खोब्रागडे, मनोज भगत, एस.के. श्रीवास्तव, एस.एस. रॉय, आनंद लांबाडे, डी.एल. झाडे, राजेश धरमाले यांचे उपोषण नरेश पुगलिया यांनी लिंबुपाणी पाजून सोडविले व आंदोलनाची सांगता केली.
यावेळी नरेश पुगलिया म्हणाले, कोणताही उद्योग वीज, पाणी, कोळसा व कच्चा माल उपलब्ध झाल्याशिवाय चालु शकत नाही. बल्लारपूर पेपर मिलची दर दिवसाची क्षमता हजारावर टन कागदासाठी लागणारा लगदा (पल्प) तयार करण्याची आहे. मात्र कच्चा मालाच्या तुटवड्यामुळे हे प्रमाण ७०० टनाच्या आसपास आले आहे. वनमंत्रालयाने विदर्भासाठी बांबू लिलावाची प्रक्रिया दोनदा केली. त्या बिल्ट व्यवस्थापन सहभागी झाले. मात्र एकाच उद्योगाने भाग घेतल्याच्या कारणावरून निविदा प्रक्रिया रद्द केली. परिणामी येथील हजारोवर कामगारांचा जीव टांगणीला लागला होता.
बल्लारपूर पेपर मिल उद्योगावर ओढवलेले संकट दूर करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यांनी चर्चेला बोलावून पेपर मिलला लागणारा कच्चा मालाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती नरेश पुगलिया यांनी दिली. यावेळी बी.पी.एम. मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे, अ‍ॅड. अविनाश ठावरी, देवेंद्र आर्य, रामदास वागदरकर, रजनी मुलचंदानी, छबुताई मेश्राम, दिलीप माकोडे आदीे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The positive role of chief minister