सकारात्मक चर्चेने समाधान वाटले

By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:16+5:302016-04-03T03:50:16+5:30

लोकमतने पुणे येथे आयोजित केलेल्या ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या भव्यदिव्यतेने आपण भारावलो.

Positive discussions felt satisfactorily | सकारात्मक चर्चेने समाधान वाटले

सकारात्मक चर्चेने समाधान वाटले

बाबासाहेब वासाडेंचे अनुभव कथन : एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र
चंद्रपूर : लोकमतने पुणे येथे आयोजित केलेल्या ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या भव्यदिव्यतेने आपण भारावलो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकमतने शैक्षणिक क्षेत्रावर चांगली आणि सकारात्मक चर्चा घडवून आणली. एका शैक्षणिक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून या चर्चेने आपण समाधानी झालो, असे मत कृषी जीवन विकास प्रतिष्ठान येनबोडीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी व्यक्त केले.
अ‍ॅड.बाबासाहेब वासाडे यांच्या कृषी जीवन विकास प्रतिष्ठानच्या अंतर्गत जिल्ह्यात अनेक शाळा-महाविद्यालय कार्यरत आहेत. ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमाबाबत त्यांना काय वाटले, हे जाणून घेण्यासाठी लोकमतने त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी कार्यक्रमाच्या सादरीकरणाबाबत मनापासून कौतुक केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्यासमक्षच शैक्षणिक क्षेत्रातील समस्या आणि उणिवा मांडण्यात आल्या. त्यामुळे कार्यक्रम परिणामकारक झाला. शासनाने शिक्षकांसाठी सीईटी परीक्षा सक्तीची केली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात इंटरनेट, संगणकांची सुविधा नाही. त्यामुळे होतकरू आणि हुशार मुलांचे नुकसान होत आहे. याबाबत बाबासाहेब वासाडे यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले आणि यात सुधारणा करण्याची मागणी केली. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांनी यात आवश्यक ते बदल केले जाईल, अशी ग्वाही दिल्याचेही वासाडे यांनी सांगितले.
होतकरू विद्यार्थ्यांना शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र या शिष्यवृत्ती वाटपात शासनाकडून अनियमितता होत आहे. याबाबीकडेही शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. दोन वर्षांपासून राज्य शासनाने शिष्यवृत्तीचे पैसे दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असे या कार्यक्रमात अनेक शैक्षणिक संस्थाचालकांनी सांगितले.
सध्याचे शिक्षण चांगले असले तरी आणखी व्यवसाय ओरीएन्टेड शिक्षण असले पाहिजे. तंत्र शिक्षणात बदल होऊन हे शिक्षणच बेरोजगारांना व्यवसायासाठी कामात आले पाहिजे, असे मतही संस्थाचालकांनी यावेळी मांडले.
स्किल डेव्हलपमेंटवर आधारित शिक्षण आले पाहिजे, याचा तरुणांना चांगला फायदा होईल. या मुद्यावरही या कार्यक्रमात ताकदीने चर्चा झाली. यावर मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी चांगल्या आणि सकारात्मक बोलल्या.
धडपडे आणि प्रचंड कार्यक्षमता असणारे व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी झाले असल्याने कार्यक्रम प्रभावी झाला. लोकमतने संबंधित खात्याच्या दोन्ही मंत्र्यांसमोर सामूहिकरित्या शैक्षणिक क्षेत्रावर चर्चा घडवून आणल्याने याचा निश्चितच परिणाम होईल, अशी आशा बाबासाहेब वासाडे यांनी व्यक्त केली.
लोकमतचे चेअरमन विजय दर्डा हे दिवसभर कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनीही सर्व समस्या ऐकून घेतल्या, याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Positive discussions felt satisfactorily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.