पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण
By Admin | Updated: August 8, 2015 01:08 IST2015-08-08T01:08:50+5:302015-08-08T01:08:50+5:30
वातावरणातील बदल, तापमानातील चढ-उतार व अवेळी येणारा रिमझिम पाऊस यामुळे पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण झाली आहे.

पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण
पोंभुर्णा : वातावरणातील बदल, तापमानातील चढ-उतार व अवेळी येणारा रिमझिम पाऊस यामुळे पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण झाली आहे. पोंभुर्णा शहरही या आजाराने ग्रासले आहे. शहरातील स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
सर्दी, खोकला, थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे, कंबरदुखी, मळमळ होणे, डोके दुखणे आदी आजाराचे प्रमाण वाढू लागल्याने पोंभुर्णा तालुक्यातील खाजगी दवाखान्यामध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही बाह्यरुग्णांची संख्या वाढली आहे. परिसरामध्ये अधुन-मधून पावसाची रिमझिम सुरूच आहे. मात्र तालुक्यातील गावागावांतील स्थानिक स्वराज्य संस्थाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विविध आजारात वाढ झाली आहे. मात्र डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार घेतल्यास आजार बरे होवू शकतात.
हवा आणि अन्नातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणुमुळे सर्दी, खोकला, ताप येणे, उलट्या होणे, अतिसार यासारख्या आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येवरून ही बाब दिसून येते. साथीच्या आजाराची लागण सुरू असल्याने खासगी व सरकारी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी व विहिरींमधील पाणी दूषित झाले आहे. नळाद्वारे त्याच पाण्याचा पुरवठा होत असल्याने जलजन्य आजारात वाढ झाली आहे.
सध्या पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये रिमझिम स्वरूपाचे पाऊस पडत असल्याने वातावरणातील बदल व परिसरातील घाणसदृश स्थितीमुळे तालुका परिसरामध्ये डासांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच तालुक्यामध्ये असणारे फायलेरिया कर्मचारी हे परिसरातील नाल्यामध्ये फवारणी करण्याकडे अनेक दिवसांपासून पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
त्यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हे कर्मचारी कोणते काम करतात. त्यांना काम न करता वेतन कसे दिले जाते, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून तालुका परिसरामध्ये फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)