जिल्हाभरात मतदान प्रक्रिया शांततेत
By Admin | Updated: October 15, 2014 23:31 IST2014-10-15T23:31:48+5:302014-10-15T23:31:48+5:30
विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ब्रह्मपुरीत पावसाने व्यत्यय आणला, मात्र दुपारी मतदानाने जोर पकडला.

जिल्हाभरात मतदान प्रक्रिया शांततेत
चंद्रपूर : विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ब्रह्मपुरीत पावसाने व्यत्यय आणला, मात्र दुपारी मतदानाने जोर पकडला.
१५ आॅक्टोबरच्या रात्री अडीच वाजता सिंदेवाहीचे माजी पंचायत समिती सभापती अरविंद जयस्वाल एका काँग्रेस पदाधिकाऱ्यासह दुचाकीने येताना पोलिसांना आढळले. त्यावरून झालेल्या चौकशीदरम्यान प्रकरण विकोपाला गेले. त्यांना पोलिसांनी अटक करुन ठाण्यात नेले. मात्र तिथे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना चंद्रपुरातील एका खाजगी रूग्णालयात आणून उपचार करण्यात आल्याने वातावरण दिवसभर गरम होते. अशातच, ब्रह्मपुरीतील एका केंद्रावर राकाँचे कार्यकर्ते रक्कम वाटत असल्याची तक्रार आ. विजय वडेट्टीवार यांनी पोलिसात केल्याने या घटनेवरूनही काही काळ शहरात वातावरण गरम झाले होते. हे दोन अपवाद वगळता आणि दुपारी पावसाचा व्यत्यय वगळता मतदान सुरळीत पार पडले.
चिमूरमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी उमेदवारांच्या एकमेकांविरुद्धच्या तक्रारींमुळे मतदानाच्या दिवशी वातावरण गरम राहील, असा बहुतेकांचा अंदाज होता. पोलिसांनीही या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त लावला होता. मात्र कसलाही प्रकार न घडता ३०५ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. सायंकाळनंतर काही केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. वरोरा विधानसभा मतदार संघातील ३११ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. केवळ इव्हिएम मशिनमधील तांत्रिक बिघाड वगळता कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. वरोरा तालुक्यात तीन ठिकाणी मतदान यंत्र बंद पडले होते. त्यामुळे अर्धा तास मतदान ठप्प पडले. नंतर मात्र पूर्ववत सुरू झाले. केम येथील मतदान केंद्रावर अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला. त्यामुळे या केंद्रावरील मतदान काही काळ बंद पडले होते. त्यानंतर केंद्राध्यक्षाला मशीन बदलवून मागण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)