दारुबंदीने पोलिसांवरचा ताण वाढला
By Admin | Updated: April 25, 2015 01:29 IST2015-04-25T01:29:51+5:302015-04-25T01:29:51+5:30
लोकसंख्येच्या दृष्टीने अगोदरच मनुष्यबळ कमी आणि त्यातच दारुबंदी झाल्यामुळे पोलिसांवरचा ताण वाढला आहे.

दारुबंदीने पोलिसांवरचा ताण वाढला
नागभीड : लोकसंख्येच्या दृष्टीने अगोदरच मनुष्यबळ कमी आणि त्यातच दारुबंदी झाल्यामुळे पोलिसांवरचा ताण वाढला आहे. या ताणाचा त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे. एवढेच नाही तर जुने तपासाची अनेक प्रकरणे पेडिंग पडत असल्याचेही बोलल्या जात आहे.
नागभीड तालुक्यात गावांची संख्या ११४ आहे. येथील लोकसंंख्या १ लाख २६ हजार असून नागभीड तालुका ५१ हजार ६६६ हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तारला आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाच्या या तालुक्यात केवळ नागभीड येथेच एक पोलीस ठाणे आहे. संपूर्ण तालुक्याची शांतता व सुव्यवस्था राखण्यात आतापर्यंत येथील पोलिसांची दमछाक होत होती. त्यातच आता १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू करण्यात आल्याने पोलिसांवरचा भार आणखी वाढला आहे.
नागभीड तालुक्याची सीमाही दारुमुक्त असलेल्या भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांना लागून असल्याने दारुबंदी यशस्वी होण्यासाठी येथील पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. यासाठी कान्पा आणि बाम्हणी येथे पोलीस चौक्या बसवण्यात आल्या आहेत. नागभीड पोलीस ठाण्यात सध्यास्थितीत एक पोलीस निरीक्षक, तीन सहा. पोलीस निरीक्षक आणि ५० शिपाई जमदार कार्यरत आहेत. यातील एक सहा. पोलीस निरीक्षक आणि १४ शिपाई यांची केवळ दारु बंदीच्या कर्तव्यावर असून उरलेल्या केवळ ३५ शिपाई जमदारांवर तालुक्याची व्यवस्था आहे. (तालुका प्रतिनिधी)