सावरगावच्या पोलीस पाटलाकडून माजी सैनिकाच्या कुटुंबाला मनस्ताप
By Admin | Updated: September 27, 2014 23:13 IST2014-09-27T23:13:03+5:302014-09-27T23:13:03+5:30
येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील पोलीस पाटील रवींद्र बोरकर हे माजी सैनिक प्रकाश मांढरे यांच्या घराजवळच राहत असून त्यांची शेतीला शेती लागून आहे. शेतीविषयक अनेक

सावरगावच्या पोलीस पाटलाकडून माजी सैनिकाच्या कुटुंबाला मनस्ताप
तळोधी (बा.) : येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील पोलीस पाटील रवींद्र बोरकर हे माजी सैनिक प्रकाश मांढरे यांच्या घराजवळच राहत असून त्यांची शेतीला शेती लागून आहे. शेतीविषयक अनेक बाबतीत बोरकर हे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप तळोधी (बा.) येथे आयोजित पत्रकापरिषदेत माजी सैनिक प्रकाश मांढरे यांनी केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना मांढरे म्हणाले, नागभीड तहसील कार्यालयात रवींद्र बोरकर यांनी केलेल्या अर्र्जानुसार त्यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या गट क्र. ४८७ मध्ये एक बोअरवेल आहे. मात्र नागभीड तहसीलदारांच्या आदेशान्वये मंडळ अधिकारी वाय.एच. चांदेकर यांनी केलेल्या मोका पंचनाम्यानुसार सदर बोअरवेल गट क्रमांक ४५३ व गट क्रमांक ४५२ या दोन्ही शेताच्या मधोमध आहे. मात्र निश्चित ठिकाण ते दर्शवू शकले नाहीत. त्याचप्रमाणे मांढरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ४९० च्या शेतात चिकूची बाग असून बागेत मागील आठ-नऊ वर्षांपासून ४०-४५ चिकूची झाडे आहेत. सदर चिकूच्या बागेतून बोरकर यांनी पाईपलाईन टाकली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
परंतु मांढरे यांच्या म्हणण्यानुसार, पाईप लाईन केव्हा टाकली व विनापरवानगीने माझ्या शेतातून कशी टाकली, हे न उलगडणारे कोडेच आहे. प्रकाश मांढरे यांनी सावरगाव येथील तलाठी कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता, सदर प्रकरणी ५ मार्च २०१४ रोजी नायब तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी मोका चौकशी केली असून त्यानुसार मोक्यावर असलेल्या बोअरवेल व पाईपलाईनची काल्पनिक स्थिती नकाशात दर्शविली आहेत. परंतु बोअरवेल व पाईपलार्इंची नोंद मूळ नकाशात केली जात नाही किंवा तसा आदेश नसल्याचे तलाठी यांनी लेखी स्वरुपात कळविले आहे.मांढरे यांचे म्हणण्यानुसार, रविंद्र बोरकर यांच्या गट क्र. ४५२ या शेताची आराजी ३० आर आहे. यातील काही जमीन घर बांधकामासाठी तिघांना विकली असून स्वत:चे घरही त्यांनी याच जागेवर बांधले आहे. तरीपण ९ डिसेंबर २००९ ला भूमापन अधिकाऱ्यांनी केलेल्या मोजणीनुसार जमिनीचे क्षेत्रफळ ३० आर ऐवजी ३३ आर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बोरकर यांची जमिन कमी होण्याऐवजी वाढण्याचा चमत्कार घडला.(वार्ताहर)