जनकापुरातील अड्याळमेंढा तलावाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST2021-03-08T04:26:39+5:302021-03-08T04:26:39+5:30
नादुरुस्त तलाव गेटमुळे शेतकऱ्यांना अडचण : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष सावरगाव : नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील अड्याळमेंढा तलावाचे गेट नादुरुस्त ...

जनकापुरातील अड्याळमेंढा तलावाची दुर्दशा
नादुरुस्त तलाव गेटमुळे शेतकऱ्यांना अडचण : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
सावरगाव : नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील अड्याळमेंढा तलावाचे गेट नादुरुस्त असल्याने तलावाच्या दुर्दशेमुळे येथील शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.
परिणामी, दुबार पीक घेण्यास असमर्थ ठरत आहे.
येथील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व पारंपरिक व्यवसाय आहे. गावातील अनेक कुटुंबे शेती हा व्यवसाय करूनच त्यांची उपजीविका करतात. शिवाय, या व्यवसायावरच आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधतात. या गावाच्या शिवारात जवळपास तीन तलाव आहेत. या तिन्ही मोठ्या तलावांमुळे परिसरातील शेतकरी हजारो हेक्टरवर खरीप आणि रब्बी पिके घेत असतात. परंतु, जनकापूर येथील अड्याळमेंढा तलावाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे आणि पीक घेण्यास असमर्थ ठरत आहे. सदर तलावाच्या पाण्याने अंदाजे ५०० हेक्टरवरील शेती दुबार सिंचित केली जाते. तलावात गावातील मच्छीमार सोसायटीमार्फत मत्स्य व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, मागील जवळपास तीन ते चार वर्षांपासून या तलावाच्या गेटच्या लोखंडी पाट्या पूर्णपणे जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे मागील काळात प्रचंड पर्जन्यवृष्टी होऊनसुद्धा तलावाच्या पाण्याची पातळी शून्यावर आली आहे.
भौगोलिकदृष्ट्या बघितले तर सदर तलावाभोवती सुंदर वनराई नटलेली आहे आणि सभोवतालच्या परिसरात वन्यप्राण्यांचा सारखा व बारमाही वावर असतो. येथे बिबटे, अस्वल, पट्टेदार वाघ, रानगवा, हरीण, सांबर, चितळ आदी लहानमोठे प्राणी आणि मोठे हिंस्र प्राणीसुद्धा येथे बघायला मिळतात. या बाबीचा शासनाने विचार करणे गरजेचे आहे.
बॉक्स
वारंवार दिली निवेदने, मात्र उपयोग नाही
या संदर्भात गेट दुरुस्ती करण्याकरिता लाभधारक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग, सिंचाई शाखा नागभीड आणि सिंदेवाही विभागाला वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, त्यांना सदर विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर अधिकारीवर्ग प्रचंड उदासीन का, असा गहन प्रश्न निर्माण होत आहे.
बॉक्स
मत्स्य व्यवसाय डबघाईस
गेटच्या नादुरुस्तीमुळे शेतकरीवर्गाला दरवर्षी पिकाच्या तोंडी आलेल्या घासाला मुकावे लागत आहे. तसेच तलावातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर असल्याने मच्छीमार सोसायटीचा मत्स्य व्यवसायसुद्धा डबघाईस आला आहे. दरम्यान, संबंधित पाटबंधारे विभागाच्या सिंचाई शाखेने या बाबीची गंभीर दखल घेऊन तलावाच्या गेटची तत्काळ दुरुस्ती करून देण्यात यावी, अशी मागणी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदास शेंडे व लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे.
कोट
जनकापुरातील अड्याळमेंढा तलावाची अवस्था अत्यंत वाईट आहे. गेट सुरळीत नसल्याने पाणी आटण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, लाभार्थी शेतकरी दुबार पीक घेण्यापासून मुकले आहेत.
- ब्रह्मादास शेंडे,
युवा सामाजिक कार्यकर्ते,
जनकापूर