चंद्रपूरच्या विकासासाठी लोकसहभाग ओसंडला
By Admin | Updated: August 28, 2015 01:15 IST2015-08-28T01:15:33+5:302015-08-28T01:15:33+5:30
चंद्रपूर शहराच्या विकास आराखड्यासाठी गुरूवारी नागरिकांनी ओसंडून प्रतिसाद दिला. शहराचा सर्वांगसुंदर विकास आराखडा तयार करून....

चंद्रपूरच्या विकासासाठी लोकसहभाग ओसंडला
सुधीर मुनगंटीवारांनी दिले आश्वासन : सर्वांगसुंदर विकास आराखडा तयार करू
विकास परिषदेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विकास कामांसाठी गुणांकन पद्धत अवलंबणार
चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या विकास आराखड्यासाठी गुरूवारी नागरिकांनी ओसंडून प्रतिसाद दिला. शहराचा सर्वांगसुंदर विकास आराखडा तयार करून हे शहर भविष्यात सुंदर बनविण्याचा संकल्प राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्यातचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. तसेच, या कामासाठी निधीची कमतरता पडून देणार नाही असे आश्वासन देत विशेष बाब म्हणून महानगर पालिकेला उपलब्ध करून दिलेला निधी गुणवत्तापूर्ण कामासाठी वापरला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चंद्रपूर महानगर पालिकेच्या आयोजनातून आणि ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर शहर विकास परिषद स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात पार पडली. आमदार नाना श्यामकुळे, आमदार डॉ. संजय धोटे, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, अधीक्षक अभियंता बालपांडे, उपमहापौर वसंता देशमुख, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार व मनपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
परिषदेमध्ये बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, लोकांच्या रुचीवर शहराचा विकास अवलंबून असतो. विकासाची प्रक्रिया लोकसहभागातून पुढे जावी यासाठी या परिषदेचे आयोजन आहे. लोकसमित्या आणि लोकनियंत्रण यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, सरकारकडून आलेला पैसा हा जनतेचाच असतो. त्यामुळे नागरिकांनीही होणाऱ्या कामावर बारीक लक्ष ठेवावे. कामाचा विनियोग जनतेच्या उपयोगासाठी झाला पाहीजे असी सांगून नेताजी नगर भवन या निकामी इमारतीचे उदाहरण त्यांनी दिले. फ्लॅक्समुळे शहराचचे सौंदर्य बिघडत असेल तर त्यासाठी नियोजन करावे, असा सल्ला त्यांनी महापौरांना दिला. जिल्ह्याच्या विकासासाठी पुरवणी मागण्यांमध्ये १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून प्रत्येक पैशाचा उपयोग झाला पाहिजे. व्यर्थ खर्च होता कामा नये, कामे झाल्यावर नागरिकांच्या तक्रारी येऊ नये म्हणून विकासाच्या कामात नागरिकांना सहभागी करुन घेण्यासाठी ही परिषद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्हा विकास आराखड्यासाठी परिषद घेण्याचे जाहीर करून हा जिल्हा महाराष्ट्रात सुंदर घडविण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी आमदार नाना शामकुळे व महापौर राखी कंचलार्वार यांचीही भाषणे झालीत. प्रास्ताविकातून मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी आराखडा मांडला. संचालन मनपा उपआयुक्त विजय इंगोले यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)
नागरिकांनी मांडल्या सूचना
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात नागरिकांनी शहर विकासाच्या विविध व उपयुक्त सूचना मांडल्या. अनेक नागरिकांनी आणि संघटनांनी तर आपण स्वत: शहर विकास आराखडयाच्या अंमलबजावणीसाठी योगदान देणार असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगितले. समाजाच्या विविध क्षेत्रातील व स्तरातील नागरिकांसह महिलांचाही लक्षणिय सहभाग होता. या कार्यक्रमास चौथ्या वगार्तील विद्यार्थिंनी अदा खान हिने उपस्थिती लावून पालकमंत्र्यांच्या उपक्रमाची स्तुती केली. आलेल्या सर्व सूचनांचा अभ्यास करुन सर्व समावेशक व लोकाभिमुख आराखडा तयार करण्याचे व चार वर्षांत टप्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
आमदार श्यामकुळेंच्या भाषणात ना. मुनगंटीवारांचाच गौरव
विकास आराखडा परिषदेमध्य चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे यांनी शहराच्या विकासासाठी त्यांच्या काय संकल्पना आहेत, हे सांगण्यापेक्षा ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाचा आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची यादी सांगून त्यांचा गौरव करण्यातच परिषदेचा वेळ घेतला. पंचशताब्दी निधी अंतर्गत आघाडी सरकारच्या काळात जाहीर झालेल्या २५० कोटी रूपयांचा उल्लेख त्यांनी केला. २५० कोटी दिल्याचे सांगून २५ कोटी रूपये देणे आणि तो निधीही पूर्ण खर्च न करणे म्हणजे विकास नव्हे, अशी कोपरखळी त्यांनी कुणाचेही नाव न घेता मारली.