रस्त्याविना जगताहेत मेटेगावचे नागरिक
By Admin | Updated: February 18, 2015 00:54 IST2015-02-18T00:54:18+5:302015-02-18T00:54:18+5:30
तालुका मुख्यालयापासून अवघ्या अकरा किमी अंतरावर व घनदाट जंगलाच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या मेटगाव येथील नागरिक स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही रस्त्याविना जगत आहेत.

रस्त्याविना जगताहेत मेटेगावचे नागरिक
उदय गडकरी सावली
तालुका मुख्यालयापासून अवघ्या अकरा किमी अंतरावर व घनदाट जंगलाच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या मेटगाव येथील नागरिक स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही रस्त्याविना जगत आहेत. येथे केवळ दहा आदिवासी कुटुंब असून ५७ गावकऱ्यांची ही कहानी अतिशय थक्क करणारी आहे.
स्वातंत्र्य पूर्व काळातील मेटेगाव साधनसंपत्तीने समृद्ध व वनवैभवाने नटलेले गाव होते. त्या गावात पारंपारिक पद्धतीने लोखंड तयार करण्याचे काम चालायचे, हे परिसरात सापडत असलेल्या दगडांच्या अवशेषावरुन निदर्शनास येते. त्या काळात या गावाची लोकसंख्या ७११ इतकी असल्याची नोंद पोलीस ठाण्यात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आज येथे केवळ ५७ इतकीच लोकसंख्या असून दहा घरांची वस्ती आहे. परंतु, स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही गावात जाण्यासाठी शासनाकडून रस्ता मिळालेला नाही. हे गावाचे दुर्दैवविलास आहे.
जंगलातून पायवाट असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत गावकऱ्यांची मोठी कसरत होते. तर दररोज जंगली श्वापदांमुळे भितीचे वातावरण असते. दळणवळणाच्या सोईअभावी अचानक उद्भवलेल्या आजारामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने सदर गावाला भेट दिली असता, अनेक बाबी उजेडात आल्या.
मेटेगाव आज ज्या दयनिय परिस्थितीत आहे, त्याकडे पाहून स्वातंत्र्यपूर्व काळात या गावामध्ये लोखंड निर्मिती होत असेल, याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी वास्तव्याला असताना तेथे पारंपारिक पद्धतीने लोखंड निर्मिती करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. गावाच्या सभोवताल सुमारे अर्धा किमी अंतरापर्यंत लोखंड सदृष्य दगडांचे ढीग आढळून येतात.
आढळून आलेल्या दगडांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली असता लोखंड निर्मिती कशा पद्धतीने करायचे याबद्दल गावकऱ्यांना काही कल्पना नाही. मात्र शुद्ध लोखंडाच्या निर्मितीनंतर उरलेला मळ किंवा कच्चा माल असावा, असे दगडांच्या अवशेषावरुन निदर्शनास येते. आजच्या घडीला येथे आदिवासी समाजाची केवळ दहा घरे असून साध्या प्राथमिक शिक्षणाची सोय या गावात झालेली नाही. अडीच किमी अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. परंतु, गावाच्या सभोवताल दुसऱ्या गावापर्यंत घनदाट जंगल असल्याने लहान मुलांना शाळेत पाठविणे शक्य नाही. शिवाय जंगली श्वापदांच्या भितीने जीव मुठीत घेऊन त्यांचे जीवन जगणे सुरू आहे. सुदैवाने जंगली श्वापदांमुळे आतापर्यंत जीवीत हानी झाली नसली तरी, पुढे होणार नाही, याची शक्यता कमीच आहे. वाघाचे दर्शन दररोजच होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
या गावात जवळपास ५०० एकर शेती असल्याचे सातबाराच्या उताऱ्यावरुन दिसून येते. परंतु, गावात ज्यांची शेती आहे ते सर्व मालक वेगवेगळ्या गावात वास्तव्याला गेले आहेत. मात्र त्यांच्या मालकीची शेती या गावात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
नकाशात चारही दिशेने रस्ते
गावातून बाहेर गावाला जाण्यासाठी चारही दिशेने रस्ते असल्याची नोंद नकाशामध्ये आढळून येते. परंतु, या गावात जाण्यासाठी प्रत्यक्षात एकही रस्ता नाही. १२७ ते १३० या क्रमांकाच्या सातबारा उताऱ्यात ०.८४ आर.जमीन रस्त्यासाठी असल्याची नोंद आहे. विद्यमान परिस्थितीत ही सर्व जागा वनविभागाची असल्याचे समजते.
वन कायद्याची अडचण
जंगलाच्या ज्या भागातून मेटेगावला जाण्यासाठी पायवाट आहे. ते संपूर्ण जंगल कम्पार्टमेंट नं. १८४ चे असून पूर्णत: वन विभागाच्या मालकीचे आहे. त्यामुळे वन कायद्याचा अडसर याही ठिकाणी आला आहे.