अंधारल्या रात्रीही पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:45 IST2018-04-08T23:45:18+5:302018-04-08T23:45:18+5:30
एप्रिल महिन्यातच पाण्याची भिषण टंचाई जाणवू लागली आहे. नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहे. गावातील विहिरी पूर्णत: आटल्या आहेत. घरगुती बोअरवेलला पाणी येत नाही. पाण्यासाठी गावोगावी भटकंती सुरू आहे.

अंधारल्या रात्रीही पायपीट
प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : एप्रिल महिन्यातच पाण्याची भिषण टंचाई जाणवू लागली आहे. नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहे. गावातील विहिरी पूर्णत: आटल्या आहेत. घरगुती बोअरवेलला पाणी येत नाही. पाण्यासाठी गावोगावी भटकंती सुरू आहे. राजुरा तालुक्यातील निंबाळावासीयांना तर मध्यरात्री उठून पाणी भरावे लागते आहे.
राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले निंबाळा हे जेमतेम ६५० लोकसंख्या असलेले गाव. वळणवाटेने या गावात प्रवेश करावा लागतो. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याने कळमना (वाढई) ग्रामपंचायतीतून निंबाळा गावाचा कारभार चालतो. गावात दरवर्षीच पाणी टंचाई असते. परंतु यावर्षी पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले आहे. गावात दोन विहिरी आहेत. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने त्या कोरड्या गेल्या आहेत. गावात एक सरकारी हातपंप आहे. मात्र पातळी खालावल्याने त्या हातपंपालाही पाणी येत नाही. अख्खे गावच एका हातपंपावर पाणी भरते. त्यासाठी महिलांना पाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. या हातपंपाला पाणी येत नसल्याने पाण्याची साठवणूक होऊ द्यावी लागते. त्यानंतर रात्री २, ३ वाजता, जेव्हा डोळा उघडेल तेव्हा हातपंपावर जाऊन पाणी भरावे लागत आहे.
निंबाळा गावात पाणीटंचाईमुळे गावकरी रात्रभर पाण्यासाठी भटकंती करतात, अशी माहिती मिळताच प्रस्तुत प्रतिनिधीने या गावाला भेट दिली. गावात गेल्यागेल्याच पाण्याची भिषण टंचाई निदर्शनास आली. गावात पाणीटंचाई असल्याने गावकरी मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी केविलवाणी धडपड करतात. काही नागरिक बैलबंडीवर ड्रम बांधून शेतात असलेल्या बोअरवेलवरुन पाणी आणत असल्याचे सांगण्यात आले. पण ज्यांच्याकडे पाणी आणण्याची कोणतीच सोय नाही, त्यांना पाण्यासाठी रात्रभर जागावे लागते.
प्रस्तुत प्रतिनिधीने गावाला भेट देऊन येथील महिलांची चर्चा केली असता तानेबाई मेश्राम ही वयोवृद्ध महिला म्हणाली, आमच्या गावात पाणी नाही. विहिरी आटल्या आहेत. हातपंपाला बरोबर पाणी येत नाही. त्यामुळे आम्हाला रात्रभर पाणी भरावे लागते, असे त्यांनी सांगितले. अर्चना झाडे, सुनंदा मेश्राम, अनिता बोरकर, ब्रिंदा कोंगरे, किरण कोंगरे, तानेबाई मेश्राम, सुनिता चुधरी, कुसूम मेश्राम, कलाबाई झाडे, वच्छला शिडाम, लता झाडे, सुनिता बोरकर, पार्वता मेश्राम, किरण मेश्राम, सोनी मेश्राम, रुपा बोरकर या सर्व महिला गावातील एकाच हातपंपावर पाणी भरताना दिसल्या. त्यांना बोलते केले असता त्या म्हणाल्या, गावात या हातपंपाशिवाय कुठेच पाणी मिळत नाही. आमचे गाव कळमना ग्रामपंचायतीत येत असल्याने सरपंच, उपसरपंच कळमना येथे राहतात. गावात पाण्याची बोंब असताना त्यांना याबाबत काही देणेघेणे असल्याचे दिसत नाही.
दोन किमीवरुन बैलबंडीने आणावे लागते पाणी
निंबाळा गावात पाणीटंचाई असल्याने येथील नागरिकांना नाईलाजाने दोन किमी अंतरावर असलेल्या शेतातील बोअरवेलवरुन पाणी आणावे लागत आहे. गावातील महिला पाण्यासाठी पायपीट करीत असून नागरिकांची पाणी मिळविण्यासाठी चाललेली धडपड केविलवाणी आहे.
आमदारांनी लक्ष द्यावे
गावात पाणीटंचाई असल्याने निंबाळा गावात पाणी मिळेणासे झाले आहे. अॅड. संजय धोटे या क्षेत्राचे आमदार असून त्यांनी गावकऱ्यांनी व्यथा जाणून घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी निंबाळावासीयांनी केली आहे.
निंबाळा गावात गावकऱ्यांना पाणी पुरवठा करणारी नळ योजना आहे. परंतु टाकीला पाणी पुरवठा करणारी विहीर आटल्याने नळ योजना प्रभावित झाली आहे. त्यामुळे निंबाळावासीयांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे.
- प्रभाकर पाल,
ग्रा.पं. सदस्य, निंबाळा