वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी रुग्णांची हेळसांड
By Admin | Updated: August 25, 2015 01:15 IST2015-08-25T01:15:14+5:302015-08-25T01:15:14+5:30
सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मूल उपजिल्हा रुग्णालयात तिनच वैद्यकीय

वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी रुग्णांची हेळसांड
मूल : सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मूल उपजिल्हा रुग्णालयात तिनच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर ५० खाटांचे श्रेणीवर्धन रुग्णालय सुरू आहे. सध्या साथीचे रोग असल्याने रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नसल्याने रुग्णांची चांगलीच हेळसांड होत असून संपात व्यक्त केला जात आहे.
जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने मूल येथे ५० खाटांचे श्रेणीवर्धन रुग्णालय बांधण्यात आले. मात्र गेल्या १२ वर्षांपासून योग्य सेवा पुरविण्यास उपजिल्हा रुग्णालय अपयशी ठरला आहे. वेळोवेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे राहात असल्याने रुग्णांवर योग्य उपचार केला जात नसल्याची ओरड सुरू आहे. आजच्या स्थितीत नऊ पैकी तीन वैद्यकीय अधिकारी तर अधिपरिचारीका १२ पैकी चारच कार्यरत आहेत.
बाह्य रुग्ण सेवेत सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ४ ते ५ अशा वेळात रुग्णांची तपासणी करुन उपचार केला जातो. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेटलतिफपणामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. २४ आॅगस्टला प्रस्तुत प्रतिनिधीने रुग्णालयात फेरफटका मारल्यानंतर सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्याची ड्युटी असताना, वैद्यकीय अधिकारी डॉ. लाडे मात्र तब्बल पाऊन तासांनी म्हणजे ४ वाजून ४५ मिनीटांनी रुग्णालयात आले. तोपर्यंत पाऊन तास रुग्ण ताटकळत उभे दिसून आले. हिच स्थिती आंतर रुग्णात सुद्धा होती.
रुग्णालयात बेडवर रुग्ण असताना देखील वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर आढळले नाही. एखाद्या वेळेस अनर्थ घडला तर वैद्यकीय सेवा मिळणार काय, असा प्रश्न जनतेनी केला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रुग्णांना योग्य सेवा देण्यास मूलचे उपजिल्हा रुग्णालय अपयशी ठरल्याचा आरोप होत असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)