पालेबारसा-उसरपार चक कालवा फुटलेलाच

By Admin | Updated: October 19, 2015 01:34 IST2015-10-19T01:34:22+5:302015-10-19T01:34:22+5:30

सावली तालुक्यातील पालेबारसा येथील कॅनलपासून ३०० फुट अंतरावरील नहर मागील वर्षापासून फुटला ...

The Pallebarsa-Usparpar Chak canal has spread | पालेबारसा-उसरपार चक कालवा फुटलेलाच

पालेबारसा-उसरपार चक कालवा फुटलेलाच

शेकडो एकर धानपीक धोक्यात : संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सावली : सावली तालुक्यातील पालेबारसा येथील कॅनलपासून ३०० फुट अंतरावरील नहर मागील वर्षापासून फुटला असल्याने ४०० एकर शेती करपण्याच्या अवस्थेत आहे. हा नहर ब्रह्मपुरी गोसेखुर्द उजवा कालवा अंतर्गत येत असल्याने विभागीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे २५० शेतकरी लाभार्थ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. पीक गर्भावस्थेत असल्याने पाण्याची नितांत गरज आहे. वेळेवर पाणी पोहाचेले नाही तर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
यासंदर्भात शेतकरी कार्यालयाला जाऊन भेटले असता उद्या, परवा येतो म्हणून खोटे आश्वासन देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान पीक वाचविण्यासाठी हात उसणे पैसे घेऊन, मजुरीचे माणसं लावून जेसीबी, पोकलॅड मशीन बोलावून काम करवून घेत आहेत. ही विचित्र अवस्था परिसरातील शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे. तरीही गोसेखुर्द ब्रह्मपुरी विभाग जागे होत नसून कामासाठी हात झटकून देत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी युवा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी वरिष्ठांकडे निवेदनातून तक्रार केली आहे.
पालेबारसा या गावाची शेती ब्रह्मपुरी गोसेखुर्द उजव्या कालव्याला लागून आहे. उसरपार चक कॅनल नं. ९० असून या मायनरमधून पाण्याचा पुरवठा शेतीला होत असतो. या कॅनलचे काम अग्रवाल कंपनी नागपूरकडे होते. मागील वर्षी पावसामुळे हा कॅनल (नहर) फुटला. त्या जागेवरच २० फुट खोल खड्डा पडला.
परिणामी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या ठिकाणापासून पुढे ३०० फुट अंतरावर पाणी पोहोचवायचे आहे. आधीच पावसाची पाणी कमी होत असताना यावर्षी पण गोसेखुर्द कालव्याचे पाणी शेतीला मिळणार याची शाश्वती नव्हती. परंतु नेत्याच्या आशीर्वादाने गोसेदुर्खचे पाणी कॅनलपर्यंत पोहोचले. शेतकऱ्यांना आशेचा नवा किरण दिसला. जलपूजनाचा कार्यक्रम आटोपून नेते मोकळे झाले. परंतु कॅनला लागून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष झाले. शेतीला पाणी पोहोचण्याची अडचण कायमच राहिली. शेवटी बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी परिस्थिती येवून ठेपल्याने लाभार्थ्यांची कार्यालाकडे धावाधाव वाढली. मात्र कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणा स्पष्ट दिसून आला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पुन्हा कर्जाचा डोंगर डोक्यावर घेवून शेतकऱ्यांना शेती करावी लागत आहे. असे असतानाही ब्रह्मपुरी गोसेखुर्द उजवा कालवा विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेतच आहेत. एरवी शेतकऱ्यांची समस्या सोडविणाारे नेतेही हातावर हात ठेवून गप्प आहेत.
उसरपार चक कॅनल नं. ९० चे पाणी पालेबारसा मायनरला येत असून याला लागून शेकडो एकर शेती आहे. याच कॅनलच्या भरोशावर येथील शेतीला पाणीेपुरवठा होतो. जवळच तलाव आहेत. पण पाऊस न पडल्याने ते कोरडे आहेत. पाण्याचे दुसरे साधन नसल्याने याच कालव्याच्या भरोशावर अवलंबून राहावे लागते. धान शेतीला भेगा पडल्या आहेत. किडी व रोगाचा प्रादूर्भाव वाढला आहे. बांधीत पाणी नसल्याने फरवारणी करता येत नाही. जमीन कडक असल्याने धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. वर्षभराचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. शेवटी पाण्याची सोय विभाग करत नसल्याने तेलही गेले तुपही गेले हाती धुपारणे आल्याची अवस्था बघायला मिळत आहे. त्यामुळे कर्जाच्या बोझ्यात शेतकऱ्याचे जीवन कायम आहे.
फुटलेला कालवा दुरुस्ती करण्यासाठी ब्रह्मपुरी उजवा कालवाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही अधिकारी वर्गाला जाग नाही. लोकप्रतिनिधींनीही याकडे पाठ फिरविली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The Pallebarsa-Usparpar Chak canal has spread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.