चार हजार कृषिपंप वीज जोडण्या पेडिंग
By Admin | Updated: June 1, 2015 01:19 IST2015-06-01T01:19:49+5:302015-06-01T01:19:49+5:30
कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू असले तरी शासनाचे धोरणच सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात आडकाठी आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चार हजार कृषिपंप वीज जोडण्या पेडिंग
मंगेश भांडेकर चंद्रपूर
कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू असले तरी शासनाचे धोरणच सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात आडकाठी आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कृषी पंपाच्या साह्याने शेती सिंचीत करून उत्पन्न घेता यावे यासाठी अनेक शेतकऱ्यांनी वीज वितरणकडे अर्ज केले, पैसे भरले. मात्र वीज वितरणच्या धोरणामुळे जिल्ह्यातील तब्बल ४०२७ शेतकऱ्यांना कृषी पंप वीज कनेक्शनसाठी वेटींगवर राहण्याची पाळी आली आहे.
अधिकाधिक शेतजमीन सिंचनाखाली आणून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. अशातच शासनाने विविध योजनाही शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय नाही, त्यांना कृषी विभागामार्फत आॅईल इंजिन, कृषी पंप असे साहित्य दिले जात आहे. मात्र वीज कनेक्शनसाठी दोन ते तीन महिन्यांचा नाही तर चक्क तीन ते चार वर्षांचा कालावधी लागत आहे.
३१ मार्च २०१४ पर्यंत जिल्ह्यातील २७५४ कृषी पंपधारक शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत होते. २०१४-१५ या वर्षांत पून्हा ३९२९ शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी अर्ज केले. यापैकी २६५६ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली. तर ४०२७ शेतकऱ्यांना पैसे भरूनही वेटींगवर ठेवण्यात आले आहे. शेतकरी वीज कनेक्शनसाठी वीज वितरण कार्यालयाचे उंबरटे झिजवत असून त्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेली नाही. उत्पादन वाढवायचे तर कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत असून डिमांड भरून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जोडणी देण्याची मागणी आहे.
उत्पन्न वाढीचे स्वप्न भंगले
निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी पंप वरदान ठरत आहेत. हवे त्या वेळी कृषी पंपाद्वारे पाणी देता येते. मात्र वीज वितरणच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीचे स्वप्न भंगले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना शेतजमीन सिंचीत करण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.
पावसाळा व दुर्गम भागामुळे अडचणी
कृषी पंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित राहण्यासाठी पावसाळा व दुर्गम भाग यामुळे अडचणी येत असल्याचे वीज वितरण कंपनीने म्हटले आहे. वीज खांब पंपापर्यंत नेण्यासाठी हिवाळ्यात व पावसाळ्यात अडचणी येतात, तर विद्युत तारा पसरविण्यासाठीही अडचणी येत असल्याचे वीज वितरणने म्हटले आहे.
कंत्राट प्रक्रियेने होणार वीज जोडण्या
वीज जोडण्या देण्याचे काम हे कंत्राट पद्धतीने करण्यात आले आहे. कंत्राटदारांची नेमणूक करून कामे सोपविण्यात आली आहेत. लवकरच वीज जोडण्या पूर्ण होतील असे वीज वितरणचे म्हणणे आहे. मात्र वारंवार विनवणी करूनही कंत्राटदार जोडणी देण्यास दुर्लक्ष करीत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.