नगरपंचायतींमधून लगतच्या ग्रामपंचायतींना वगळले
By Admin | Updated: May 10, 2014 00:07 IST2014-05-10T00:07:14+5:302014-05-10T00:07:14+5:30
नागभीड नगर पंचायत स्थापन आणि त्यावरील आक्षेपासंदर्भात अधिसुचना जारी करण्यात आली असून या अधिसुचनेनुसार या नगरपंचायतीचे ...

नगरपंचायतींमधून लगतच्या ग्रामपंचायतींना वगळले
नागभीड : नागभीड नगर पंचायत स्थापन आणि त्यावरील आक्षेपासंदर्भात अधिसुचना जारी करण्यात आली असून या अधिसुचनेनुसार या नगरपंचायतीचे कार्यक्षेत्र केवळ नागभीड ग्रामपंचायत राहणार आहे. नागभीडला लागूनच असलेल्या नवखळा आणि सुलेझरी या ग्रामपंचायतींचा या नगरपंचायतीमध्ये समावेश असणार नाही. नागभीड हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने या ठिकाणी नगर परिषदेची स्थापना करण्यात यावी, अशी येथील जनतेची फार जुनी मागणी आहे. गेल्या २० वर्षांत नागभीड शहराचे आकारमान झपाट्याने वाढत असून वाढत असलेल्या या शहराच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत ही स्वराज्य संस्था तोकडी पडत आहे. येथे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले असून नाल्या आणि रस्ता निर्मितीसाठी ग्रामपंचायतीला आमदार-खासदार या लोकप्रतिनिधींवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळेच नागभीडचा विकास आतापर्यंत ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. ही बाब लक्षात घेवून नागभीड येथे नगरपरिषदेची स्थापना करण्यात यावी, अशी नेहमीच मागणी करण्यात येत होती. यासाठी नागभीडची लोकसंख्या कमी पडत असल्याने लोकसंख्येच्या पूर्ततेसाठी नवखळा, सुलेझरी आणि तुकूम या ग्रामपंचायतींचाही समावेश करण्याच्या सुचना येत होत्या. चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी तर यासाठी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न केले. दरम्यान राज्य शासनाने सर्व तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. पण या निर्णयानुसार तालुका शहराला लागून असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळेच नागभीडला लागून असलेले नवखळा, सुलेझरी आणि तुकूम या ग्रामपंचायती नगरपंचायतीमध्ये समाविष्ट होऊ शकणार नाही. ज्या ग्रामपंचायती तालुका शहराला लागून असतील आणि नगर पंचायतीमध्ये समाविष्ट होण्यास ज्यांची हरकत नसेल अशा ग्रामपंचायतींचा नव्याने अस्तित्वात येणार्या नगर पंचायतीमध्ये समावेश करावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)