नरेगाचा मोबदला वेळेवर देण्याचे आदेश

By Admin | Updated: August 20, 2016 00:41 IST2016-08-20T00:41:17+5:302016-08-20T00:41:17+5:30

केंद्र व राज्य शासनाच्या योजना जिल्ह्यातील गरीब, ग्रामीण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात.

Orders to be given on time for the payment of NREGA | नरेगाचा मोबदला वेळेवर देण्याचे आदेश

नरेगाचा मोबदला वेळेवर देण्याचे आदेश

हंसराज अहीर : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा
चंद्रपूर : केंद्र व राज्य शासनाच्या योजना जिल्ह्यातील गरीब, ग्रामीण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात. अनेक ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मोबदला वेळेवर दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. मजुरांना नरेगाची रक्कम वेळेवर देण्याचे आदेश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या मा.सां. कन्नमवार सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक ना. अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा ना. अहीर यांनी घेतला.
यावेळी ना. अहीर म्हणाले की, काही ठिकाणी नरेगा मजूर तसेच शेततळ्यांची रक्कम वेळेत मिळत नसल्याची तक्रार आहे. सदर देयके तत्काळ देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ देताना सिकलसेलग्रस्त रूग्णांना प्राधान्याने दिला जावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
कृषि क्षेत्राला पुढे नेण्यासाठी सिंचन, वीज फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देण्यासोबतच जास्तीत जास्त शेतक?्यांनी वेळेत वीज कनेक्शन देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी ना.अहीर यांनी नरेगा, शेततळे, वैयक्तिक शौचालय, आधार लिंकेज, दिनदयाल अंत्योदन योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, ई-मोजणी, दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, नॅशनल अर्बन मिशन, अमृत व उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, पिककर्ज व पुनर्गठन आदींचा सविस्तर आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंह यांनी मागील बैठकीच्या इतिवृत्तावर माहिती दिली.
या बैठकीला आ.नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त संजय काकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

रोहयोच्या विहिरी दुहेरी लाभाच्या
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागरिकांच्या हाताला काम देणारी अतिशय महत्त्वाची योजना आहे. ही योजना ग्रामीण पातळीवर प्रभावीपणे राबवून अधिकाधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या योनजेंतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरी दुहेरी फायद्याच्या आहे. यातून मजुरांच्या हाताला काम मिळण्यासोबतच विहिरीच्या माध्यमातून सिंचनासारखी सुविधा निर्माण होत असल्याने प्रत्येक तालुक्यात या योजनेंतर्गत विहिरींची कामे मोठ्या प्रमाणावर घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शेततळ्यांची संख्या वाढविण्यासाठी शेतकरी, कंत्राटदार यांची सांगड घालण्याचे निर्देशही त्यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: Orders to be given on time for the payment of NREGA